Saturday, 24 March 2018

⭐ *तार्‍यांचा मृत्यू कसा होतो ?* ⭐
************************************

हायड्रोजन वायूचा इंधन म्हणून वापर करणाऱ्या अणुसंमीलन प्रक्रियेतून जन्माला आलेला तारा जोवर त्याच्या अंतरंगातल्या त्या अणुभट्ट्या धडधडत आहेत तोवर जिवंत असतो; पण त्याच्याकडे असलेलं हायड्रोजनचं इंधन अमर्यादित नसतं. त्याच्या सुरुवातीच्या आकारमानावर ते किती काळ पुरेल हे अवलंबून असलं तरी काही वर्षांनंतर का होईना हे संपुष्टात येतंच. तसं झालं की त्या अणुभट्ट्या विझतात. गुरुत्वाकर्षणाच्या ओढीवर मात करणार्‍या ऊर्जा उत्सर्जित करणारी प्रक्रिया बंद पडते. तारा केवळ वायूचा गोळाच राहतो. त्याच्या केंद्राची बाहेरच्या भागावरची ओढ परत उसळी घेते. त्याला आतल्या दिशेनं खेचत राहते. त्या गोळ्यावर परत प्रचंड दाब पडतो. त्याचं आकारमान घटतं. त्याचं श्वेत बटूत रूपांतर होतं. दाब आणखी वाढला की त्याचा रंग बदलत जात जात तांबडा होतो. त्याहुनही दाब वाढला की त्याचं कृष्ण बटूत रूपांतर होतं. त्यातून कोणताही प्रकाश बाहेर पडत नाही. आपल्या सूर्याची हीच अवस्था होणार आहे.

पण सूर्याहूनही मोठ्या असलेल्या ताऱ्यांची मृत्यूनंतरची अवस्था निराळी होते. त्यांची कृष्ण बटुसारखी अवस्था होताना त्याच्या गाभ्याची घनता वाढत जाते. तो जास्तच तापतो. त्याचं तापमान वाढत वाढत अशा सीमेवर पोहोचतं की आता हेलियमच्या अणुचं मीलन होऊ लागतं. विझू पाहणाऱ्या अणुभट्ट्या हेलियमचा इंधन म्हणून वापर करत परत धडधडू लागतात. परत एकदा त्यांच्यातून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बाहेर पडते. तारा आकुंचन पावला तरी परत प्रकाशमान होतो. बाहेर पडणारा तो ऊर्जेचा रेटा आतल्या दिशेनं खेचणाऱ्या गुरुत्वाकर्षणावर परत मात करतो. तारा स्थिर होतो आणि प्रकाश देत राहतो.

पण हेलियमचा साठाही मर्यादितच असतो. तो संपला की त्यातून तयार झालेल्या कार्बनचा इंधन म्हणून वापर होतो. ही प्रक्रिया वाढत्या वस्तुमानाच्या इंधनाचा वापर करत सुरूच राहते; पण त्या सर्व इंधनाचं लोहात रूपांतर झालं की त्याचा इंधन म्हणून वापर करणं अशक्य होतं. आता केंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या ओढीवर मात करणारी कोणतीही प्रक्रिया होत नाही. तार्‍याला जिवंत ठेवणाऱ्या अणुभट्ट्या कायमच्या विझून जातात.

गुरुत्वाकर्षणाची आपल्या दिशेनं असणारी ओढ मात्र कायमच असते. तिच्यापायी तो गोळा आता इतका दाबला जातो की तो दाब असह्य होऊन त्याचा स्फोट होतो. यालाच सुपरनोव्हा असे म्हणतात. त्या क्षणी तो मृत्युपंथाला लागलेला तारा इतका प्रकाशमान होतो की त्या एका ताऱ्याचा प्रकाश अख्ख्या आकाशगंगेच्या प्रकाशाहूनही जास्त होतो. काही वेळा त्या ताऱ्याचं कृष्णविवरात रूपांतर होतं.

*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून
*१३ मार्च १७८१*

*सर विल्यम हर्षल यांनी युरेनस या ग्रहाचा शोध लावला*

युरेनस सूर्यापासून सातव्या क्रमांकाचा ग्रह आहे. तो बराचसा वायूंचा बनलेला आहे. तो व्यासानुसार तिसरा आणि वस्तुमानानुसार चौथा ग्रह आहे. युरेनस ग्रह पृथ्वीच्या तुलनेत अनेक पटींनी मोठा आहे. पृथ्वीपासून त्याचे अंतर २.८ अब्ज कि.मी. आहे. युरेनसला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पुरी करण्यास ८४ वर्ष लागतात. नासाच्या "व्हॉयेजर २" या यानाने युरेनस ग्रहाला भेट दिली आहे. या ग्रहासाठी सध्या तरी कोणत्याही नव्या मोहिमेचा विचार नाही. इ.स. १९७७ साली पृथ्वीवरुन प्रक्षेपित केलेले "व्हॉयेजर २" यान जानेवारी २४ १९८६ या दिवशी युरेनसच्या सर्वांत जवळ पोहोचले. तेथुन ते नेपच्युन ग्रहासाठीच्यात्याच्या पुढच्या प्रवासाला निघून गेले.
आधुनिक काळात शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे. सर विल्यम हर्षल यांनी हा ग्रह मार्च १३ १७८१ ला शोधल्याची घोषणा केली.
युरेनसचा शोध
युरेनस हा पहिला ग्रह आहे की तो प्राचीन काळी माहिती नसला तरी त्याचे निरीक्षण मात्र केले जात होते. पण त्याला तारा म्हणून गणले जाई. विल्यम हर्शेलला सुद्धा तो प्रथम धूमकेतू वाटला होता.
भौतिक गुणधर्म
युरेनस हा प्रामुख्याने वायु व अनेक प्रकारच्या बर्फांसमान बनलेला आहे. याच्या वातावरणात ८३% हायड्रोजन, १५% हेलीयम, २% मिथेन व असिटिलीन चे काही अंश आहेत. तर अंतर्भागात ऑक्सिजन, कार्बन व नायट्रोजन यांची संयुगे तसेच खडकाळ पदार्थ आहेत. त्याचा हा अंर्तभाग गुरु व शनी ग्रहाच्या विरुद्ध आहे जो कि प्रामुख्याने हायड्रोजन व हेलीयमपासून बनलेला आहे.
नैसर्गिक उपग्रह
युरेनसला २७ नैसर्गिक उपग्रह (चंद्र) आहेत. या चंद्रांची नावे ही शेक्सपियर व अलेक्झांडर पोप यांच्या कथानकांमधील पात्रांची नावे आहेत. मिरांडा(Miranda), एरिएल(Ariel), उंब्रिएल(Umbiel), टायटानिया(Titania) आणि ओबेरॉन(Oberon) हे पाच प्रमुख चंद्र आहेत
*२४ मार्च*

*जागतिक क्षयरोग दिन (TB)*

जगभरात सोन्याचा जो साठा आहे, त्यातील 20 टक्के भारतीयांकडे आहे.अमेरिकेतील आयबीएम तसेच मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीच्या स्टाफमध्ये 28 ते 34 टक्के भारतीय आहेत.तसेच अमेरिकन स्पेस एजन्सी नासामधील तीन कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारी भारतीय आहे.अमेरिकेत प्रॅक्टीस करणारे 100 पैकी 38 डॉक्टर आपले भारतीयच आहेत. तसेच विश्वाची निर्मिती कशी झाली या विषयीचा बिग बॅंग संशोधन प्रकल्पात भारतीय शास्त्रज्ञ आहेत व्वा!
पण आता पुढील आकडेवारीवरही एक नजर टाकूया.आज आपल्या देशामध्ये दररोज 40 हजारहुन अधिक लोकांना क्षयरोगाचा संसर्ग होतो.यापैकी पाच हजारांहून अधिक लोकांनी क्षयाची लागण होते. या पैकी एक हजाराहून अधिक रूग्ण क्षयरोगाने मरण पावतात.म्हणजेच दर दीड मिनिटाला एक रूग्ण क्षयरोगाने मरण पावतो.त्याचप्रमाणे आपल्या देशात दरवर्षी अठरा लाखाहून अधिक नवीन क्षयरूग्ण आढळून येतात. त्यातील आठ लाख रूग्ण हे थुंकीदूषीत असून ते इतरांना हा रोग देण्यास सक्षम आहेत. जागतिक आरोग्य संस्थेच्या अंदाजानुसार सन 2020 मध्ये जगातील अंदाजे एक अब्ज क्षयरोगाने त्रस्त असतील. क्षयरोगाची आकडेवारी ही दिवसेंदिवस वाढत आहे. शासनस्तरावर सन 1992 मध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यामध्ये झाली व सन 2005 सालापर्यंत हा कार्यक्रम संपूर्ण देशात राबविण्याचा संकल्प सोडण्यात आला.व आज पूर्ण भारतात हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. इ.स.1882 साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक 24 मार्च रोजी मान्यता मिळाली.म्हणून दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.ज्या व्यक्तीला क्षयरोग (टि.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते.एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे इत्यादी पाठवून देऊन त्याची दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. उदा. हाडे सांध्याचा क्षयरोग,लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग,आतड्यांचा क्षयरोग इत्यादी.
सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डॉटस्‌ म्हणजे डायरेक्टली ऑब्जर्व्ह ट्रीटमेंट वूईथ शॉर्टटर्म केमोथेरपी नावाचा औषधोपचार क्षयरोगावर केला जातो.सहा महिने व आठ महिने असा हा उपचाराचा कालावधी असून नवीन क्षयरोग्यांनी सुरूवातीचे सहा महिने डॉटस्‌ची औषधी व्यवस्थीत घेऊन त्याची तपासणी दिलेल्या वेळेत केल्यास हा आजार 100 टक्के पूर्ण बरा होतो. सध्या खात्रीशीर उपचार म्हणून या डॉटस्‌ उपचार प्रणालीकडे पाहिले जाते.ही उपचार पध्दती सरकारी दवाखान्यातून मोफत दिली जाते.क्षयरूग्णाला डॉटस्‌ उपचार सुरू झाल्यास रूग्णाच्या गावातच त्याला आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी वर्कर अशा वर्कर यांच्या मार्फत डॉटस्‌ दिला जातो.
क्षयरोगाची अनेक रूग्ण, क्षयरोगाविरोधाी औषधी योग्य डोसमध्ये व योग्य कालावधीपर्यंत घेत नाहीत.या अर्धवट उपचारापुढे तसेच क्षयरोग जंतूमध्ये होणाऱ्या उत्परिवर्तामुळे क्षयरोगाविरोधी औषधी पचविण्याची किंवा त्यांना दाद न देण्याची क्षमता या जंतूमध्ये निर्माण होते. ज्या प्रमाणे डास आता डीडीटी या औषधाला दाद देत नाहीत.तद्वतच क्षयरोग जंतू या क्षयरोगविरोधी बहुविध औषधाला प्रतिसाद देत नाहीत.अशा औषधरोधक जंतूमुळे होणाऱ्या रोगास मल्टिपल ड्रग रेझिस्टन्ट टी.बी.असे म्हणतात. एमडीआर टीबी उपचार पध्दती ही साधारण 24 ते 27 महिने असून ही उपचार पध्दती खूपच खर्चीक आहे.याचा उपचार लाखोंच्या घरात असून यासाठी लागणारा खर्च शासन करीत आहे. परंतु क्षयरोग्याने सुरूवातीलाच पूर्ण उपचार (6 ते 8 महिने कोर्स) घेतल्यास ही वेळ येणार नाही.
आज देशात क्षयरोग व एडस्‌ ही दोन आजार आपल्यासमोर आव्हानात्मक उभी आहेत. एचआयव्ही/एडस्‌ ची बाधा झालेल्या व्यक्ती पैकी 60 टक्के लोकांना क्षयरोगाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. क्षयरोग हा एचआयव्ही बाधीत व्यक्तीमधील सर्वात जास्त प्रमाणात आढळून येणारा संधी साधू आजार आहे. एचआयव्हीच्या विषाणूंनी आपल्या शरीरात प्रवेश मिळविल्यानंतर ते आपले रोग प्रतिकार शक्तीच नष्ट करून टाकतात.परिणामी क्षयरोग सहजपणे होतो.याला आळा घालण्यासाठी डॉटस्‌ उपचार पध्दतीचा अवलंब केला गेला पाहिजे. डॉटस्‌ पध्दतीमुळे एचआयव्ही संसर्गीय रूग्णांच्या आयुष्याची फक्त गुणवत्ताच नव्हे तर आयुष्याची मर्यादा सुध्दा वाढू शकते हे आता सर्वज्ञात झाले आहे.
आज आपण सर्वांनी क्षयरोगाबाबत जाणीव जागृती करून समाजाप्रती उत्तराई होऊ या! या प्रसंगी एकच करूया निर्धार,आयुष्यात नकोच क्षयाचा आजार या घोषवाक्याने याची सुरूवात करूया 
✂ *बायाॅप्सी म्हणजे काय ?* ✂
*********************************

रोगाचं किंवा व्याधीचं निश्चित निदान करण्यासाठी अनेक परीक्षांचा वापर केला जातो. स्टेथोस्कोपने फुप्फुसाची परीक्षा करणं, तापमापकानं शरीराचं तापमान मोजणे, रक्तदाब मोजणे यासारख्या परीक्षा सहज करता येतात. त्यावरून निदान होत नसेल तर मग रक्त, मूत्र, विष्ठा, थुंकी यासारख्या शरीरद्रवांची परीक्षा केली जाते. त्याही पुढे जाऊन क्ष-किरण परीक्षा, ईसीजी, अल्ट्रासाऊंड, सिटी स्कॅन, एमआरआय यासारख्या परीक्षाही केल्या जातात. त्याच्या मदतीनं शरीरातील काही अवयवांमध्ये बिघाड झाला आहे अशी शंका आल्यास मग त्या अवयवाचा एक छोटासा तुकडा काढून त्यातील पेशींची सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनं परीक्षा केली जाते. पॅथालॉजिस्ट ही परीक्षा करतात. त्याच्या साहाय्यानं मग त्या पेशी निरोगी अवस्थेत आहेत की त्यांच्यात काही बदल झाले आहेत हे ठरवलं जातं; आणि बदल झाले असेलच तर ते भद्र आहेत की अभद्र आहेत याचा निर्णय केला जातो. अवयवाचा नमुना परीक्षेसाठी काढून घेण्याच्या या पद्धतीलाच बायाॅप्सी असं म्हणतात. एखाद्या अवयवाची असामान्य वाढ झालेली असली किंवा तिथे एखादी गाठ आलेली असली तर ती कर्करोगाची आहे की नाही हे ठरवण्यासाठी सहसा बायाॅप्सीचाच वापर केला जातो; परंतु काही वेळा कर्करोगाव्यतिरिक्त इतर व्याधींच्या निदानासाठीही बायाॅप्सी केली जाते.

बायाॅप्सी करण्याच्या अनेक पद्धती आहेत. रोगनिदानासाठी केल्या जाणाऱ्या बायाॅप्सीला इन्सिजनल बायाॅप्सी असं म्हणतात. पण काही वेळा त्या गाठीचा किंवा वाढलेल्या भागाचा तुकडाच न घेता संपूर्ण गाठच काढून टाकली जाते. त्याला एक्सिजनल बायाॅप्सी असं म्हणतात. रोगनिदानासाठी केल्या जाणाऱ्या बायाॅप्सीसाठीही निरनिराळय़ा पद्धती वापरल्या जातात. अतिशय मऊ अवयव असले तर केवळ घर्षणाचा वापर करून नमुना मिळवला जातो. यासाठी कापूस गुंडाळलेल्या काठीचा, कॉटन बडचा वापर होतो. तोंडाच्या आतल्या भागात तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होण्याची भीती असते. त्या रोगाचा प्रत्यक्ष प्रादुर्भाव होण्यापूर्वी काही पूर्वलक्षणं दिसतात. ती पाहण्यासाठी कॉटन बड तिथं जोरानं घासून तिथल्या पेशी मिळवता येतात. त्यांचं निरीक्षण करून कर्करोग होण्याच्या शक्यतेचं निदान केलं जाऊ शकतं. काही अवयवांच्या पेशी मिळवण्यासाठी बारीक सुई त्याच्यात घुसवून तेथील पेशी खेचून बाहेर काढल्या जातात. काही वेळा मोठ्या परिघाची सुई वापरून त्या अवयवाच्या गाभ्यातला भाग कोरून काढला जातो, तर काही वेळा सरळ सरळ चाकू लावून लहानशी शस्त्रक्रिया करून तो तुकडा कापून काढला जातो.

*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून*


*मराठी विज्ञान परीषदेचे*

      *** कुतूहल  ***

*गंधक*


मराठीत गंधक म्हणून ओळखले जाणारे सल्फर हे मूलद्रव्य प्राचीन काळापासून भारतीयांना माहिती आहे. पारा आणि गंधक एकत्र करून तयार केलेल्या पदार्थाचा आयुर्वेदात औषध म्हणून वापर केला जात असे. भारतीयांप्रमाणेच प्राचीन इजिप्त, चीन आणि ग्रीक संस्कृतींनाही गंधक माहीत होते आणि औषध व कीटकनाशक म्हणून त्याचा उपयोग प्रचलित होता. गंधक हे मूलद्रव्य आहे हे फ्रेंच शास्त्रज्ञ अँटोनी लॅव्होझिएने १७७७ मध्ये सिद्ध केले.

पिवळ्या रंगाचे स्फटिक किंवा चूर्णरूपात गंधक निसर्गात शुद्ध स्वरूपात आढळते. ज्वालामुखीच्या जवळच्या प्रदेशात गंधकाचे साठे आढळतात. पृथ्वीवर विपुल प्रमाणात आढळणाऱ्या मूलद्रव्यांमध्ये गंधकाचा दहावा क्रमांक लागतो. सोने, प्लॅटिनम यांसारखे राजस धातू सोडले तर गंधकाची इतर सर्व मूलद्रव्यांबरोबर रासायनिक प्रक्रिया होते.

१६ अणुक्रमांक असलेल्या गंधकाचा अणुभार ३२ आहे. गंधकाची ३० अपरूपे आढळतात. इतर कुठल्याही मूलद्रव्यांच्या अपरूपांपेक्षा ही संख्या जास्त आहे.

शुद्ध रूपातल्या गंधकाचा माणसाच्या आरोग्यावर कुठलाही विपरीत परिणाम होत नसला तरी मोटारींच्या धुरातून बाहेर पडणारा सल्फर डाय ऑक्साइड आणि हायड्रोजनबरोबर संयोगातून होणारा हायड्रोजन सल्फाइड हे दोन वायू मात्र धोकादायक असतात. सेंद्रिय संयुगांच्या रूपात गंधक हे सर्व सजीवांचा अविभाज्य घटक असते. आणि मानवी शरीरात ते फॉस्फरसइतक्याच विपुल प्रमाणात आढळते. प्रथिनं ज्यापासून तयार होतात त्या अमायनो आम्लांमध्ये गंधक एक महत्त्वाचा घटक असतो. तसेच बायोटीन आणि थायमिन या ‘ब’ वर्गातील जीवनसत्त्वांमध्येही गंधक असते. केराटीन या प्रथिनाला ताकद देण्याचे आणि पाण्यात अविद्राव्य करण्याचे काम या प्रथिनातील गंधक-गंधकाचे बंध करतात. केराटीन प्रथिनांपासून प्राण्यांची त्वचा, केस आणि पिसे तयार होतात. कोंबडीच्या अंडय़ातसुद्धा गंधकाचे प्रमाण खूप असते. नवीन पिल्लाची पिसे बनविण्यासाठी या गंधकाचा उपयोग होतो. यामुळेच सडणाऱ्या अंडय़ाला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. तो अंडय़ातील गंधक आणि हायड्रोजनच्या संयुगातून तयार झालेल्या हायड्रोजन सल्फाइड वायूचा असतो.

गंधकाचा उपयोग रबराचे ‘व्हल्कनायझेशन’ करण्यासाठी बंदुकीच्या दारूमध्ये आणि बुरशी प्रतिबंधक म्हणून होतो. परंतु गंधकाचा सर्वात मोठा उपयोग गंधकाम्ल (सल्फ्युरिक आम्ल) तयार करण्याकरिता केला जातो. तसेच वर्षांला जवळजवळ दहा कोटी टन इतक्या कॅल्शियम सल्फेट या गंधकाच्या संयुगाचा सिमेंट बनविण्याकरिता वापर केला जातो.


 📡 *जय विज्ञान*🔬

*भगत सिंग*

*वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले भारतीय क्रांतीकारी*

*स्मृतिदिन - २३ मार्च १९३१*

बालपण आजोबांच्या आर्यसमाजी संस्कारात घालवलेले व शालेय जीवनात रोज नित्य नेमाने सकाळ व सायंकाळ प्रार्थना करणारे व गायत्री मंत्रांचा जप करणारे भगतसिंग पुढे क्रांतिपर्वात पूर्णपणे निरीश्वरवादी झाले. यामुळे त्यांना 'आत्मप्रौढी व घमेंड यांची बाधा झाली आहे असेही उठवले गेले. मात्र ऑक्टोबर १९३० मध्ये त्यांनी लिहिलेले "मी निरीश्वरवादी का?" हे प्रकटन वाचल्यावर त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची ओळख पटते.

*समाज हा प्रगत असावा; प्रत्येक घटना, समज वा परंपरा या विचाराच्या ऐरणीवर घासून त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अंधश्रद्धेपोटी वा कुणाच्या व्यक्तिपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही गोष्ट स्वीकारू नये, समाज हा समभावी व शोषणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धर्म, जात हे आड येऊ नयेत, उगाच कुणाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी कुणीतरी मोठे सांगत आहे म्हणून जे वास्तविक नाही वा ज्याला तात्त्विक पाया नाही असे काही स्वीकारू नये.*

समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, जन्म-पुनर्जन्म, ८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्‍न होता. कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा, त्याचे भांडवलदारांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे असे भगतसिंगांचे आग्रही प्रतिपादन होते. अत्यंत प्रतिकूल व कष्टसाध्य असे जीवन समोर असताना ज्याचा मृत्यूनंतर स्वर्गप्राप्तीवर वा या जन्मात सत्कार्य केले असता मोक्ष मिळतो वा या जन्मात केलेल्या कृत्याचे फळ म्हणून पुढील जन्म अत्यंत सुखाचा जातो या गोष्टींवर विश्वास आहे त्याला समोर असलेला मृत्यू पुढील प्राप्तीच्या ओढीने सुसह्य वाटू शकतो. मात्र ज्याचा या गोष्टींवर जराही विश्वास नाही परंतु जो मातृभूमीला परदास्यातून मुक्त करणे व समाजाला शोषणातून मुक्त करून मानाचे जीवन प्राप्त करून देणे हेच आपल्या आयुष्याचे प्रथम व अखेरचे ध्येय समजतो. त्याचे जीवन हे अधिक खडतर परंतु अर्थपूर्ण असते असा त्यांचा सिंद्धान्त होता. जगात जर सर्वांत भयानक पाप असेल तर ते गरिबी व सर्वांत मोठा शाप कोणता असेल तर तो दास्य हाच आहे. आणि या दास्याला ईश्वरी कोप मानून त्या दास्यातून मुक्त होण्यासाठी बलिदानाला सज्ज होण्याऐवजी ईश्वराची करुणा भाकणे हे मूर्खपणा व पळपुटेपणाचे लक्षण आहे; तसेच मुक्तीसाठी ठोस प्रयत्‍न न करता केवळ प्राक्तनाला दोष देणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे असे त्यांनी प्रतिपादिले. सुमारे दहा पाने भरेल इतके मोठे हे प्रकटन अत्यंत प्रभावी व भारून टाकणारे आहे.

हुतात्मा भगतसिंग यांच्या चरित्राचा अभ्यास केला असता आपल्याला समजते की त्यांनी केलेले बलिदान हे भावनेच्या आहारी जाऊन वा कसल्यातरी प्राप्तीसाठी केले नसून ते अत्यंत सुनियोजित, अत्यंत ध्येयबद्ध व प्रेरणादायक होते. आपण राहणार नाही, पण आपण लावलेल्या क्रांतिवृक्षाच्या सर्व फांद्या भले शत्रूने छाटून टाकल्या तरी पाळेमुळे घट्ट रुजून राहतील व हीच मुळे एक दिवस बंदिवासाच्या भिंती उन्मळून टाकतील हा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांना आदरांजली वाहताना कुसुमाग्रजांच्या खालील ओळी सार्थ वाटतात: भगत सिंग यांचे विचार खूप मोलाचे होते ते म्हणत जिंदगी तो अपने दम पार जी जाती ही, दुसरो के कांद्हो पार तो सिर्फ जनाजे उठाये जाते ही

ब्रिटिश विरुद्धच्या दोन हिंसात्मक कार्यांमुळे  वयाच्या २३ व्या वर्षी त्यांना गळफासाची शिक्शा देण्यात आली, व भारतीय स्वतंत्र्य चळवळी मध्ये त्यांचे  नाव प्रसिद्ध झाले.

*बेडन-पॉवेल*
(२२ फेब्रुवारी १८५७-जानेवारी १९४१)

*_जगभर पसरलेल्या बालवीर (स्काऊट व गाइड) संघटनेचे जनक. संपूर्ण नाव रॉबर्ट स्टीफन्सन स्मिथ बेडन-पॉवेल. जन्म लंडन येथे. वडील ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक होते. आई इंग्लंडचे दर्यासारंग डब्ल्यू. टी. स्मिथ यांची मुलगी. बेडन-पॉवेल तीन वर्षांचे असतानाच वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर आईनेच त्यांचा सांभाळ केला. लंडनमधील चार्टर हाऊस ह्या शाळेत शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी शिक्षण घेतले._*

त्यांना १८७६ मध्ये लष्करात तेराव्या हुस्सार पलटणीत कमिशन मिळाले. त्यानंतर त्यांनी भारत, अफगाणिस्तान, द. आफ्रिका अशा विविध ठिकाणी कामगिरी बजावली. त्यांपैकी दक्षिण आफ्रिकेतील बोअर युद्धात (१८९९-१९०२) मॅफेकिंग ह्या शहराची शत्रूच्या वेढ्यापासून केलेली मुक्तता ही त्यांची उल्लेखनीय कामगिरी होय. त्यानंतर त्यांना मेजर जनरल म्हणून बढती मिळाली. दक्षिण आफ्रिकेतील पोलीस दलाला त्यांनी व्यवस्थित स्वरूप दिले व या दलाचे इन्स्पेक्टर जनरल म्हणून १९०३ पर्यंत कामही केले. १९०७ मध्ये ते लेफ्टनंट जनरल झाले.

सैनिकी स्काऊटकरिता त्यांनी लिहिलेले एड्सटू स्काऊटिंग (१८९९) हे पुस्तक शाळेतील मुलांसाठीही अतिशय उपयुक्त असल्याचे लक्षात येताच, त्यांनी इंग्लंडच्या ब्राउनसी बेटावर मुलांचे पहिले स्काऊट-शिक्षण शिबीर भरविले (१९०७) व अशा प्रकारे बालवीर संघटनेची चळवळ सुरू केली. थोड्याच दिवसात ही चळवळ अनेक देशांत पसरली. १९१० मध्ये आपली बहिण ॲग्नेस बेडन पॉवेल हिच्या मदतीने त्यांनी मुलींसाठी ‘वीरबाला’ (गर्ल गाइड) ही संघटना स्थापन केली. मुलांना व मुलींना जगाचे आदर्श नागरीक बनविणे, हा या दोन्ही संघटनांमागील त्यांचा प्रमुख हेतू होता. १९१० साली सातव्या एडवर्डच्या सल्ल्यानुसार ते सेवानिवृत्त झाले व पुढील सर्व आयुष्य त्यांनी बालवीर संघटनेसाठी वाहून घेतले. १९१२ मध्ये ओलेव्ह सोम्स यांच्याशी त्यांचा विवाह झाला व तेव्हापासून वीरबाला संघटनेची सर्व जबाबदारी त्यांच्या पत्नीने लेडी बेडन पॉवेल (१८८९-१९७७)- स्वीकारली. १९१२-१३ पर्यंत बालवीर व वीरबाला या संघटनांची पथके बेल्जियम, हॉलंड, अमेरिका, भारत, चीन, रशिया, हवाई बेटे इ. राष्ट्रांमध्ये सुरू झाली. जगभर पसरलेल्या ह्या संघटनांची पाहणी करण्यासाठी बेडन-पॉवेल व त्यांच्या पत्नी यांनी सर्व राष्ट्रांना वेळोवेळी भेटी दिल्या. भारतास ह्या दोघांनी १९२१ व १९३७ मध्ये भेट दिली.

लंडन येथे १९२० मध्ये भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय स्काऊट मेळाव्याच्या (जांबोरीच्या) वेळी ‘जगाचे प्रमुख स्काऊट’ (चिफ स्काऊट) हा बहुमान त्यांना सर्वानुमते मिळाला. १९२२ मध्ये ‘बॅरोनेट’ व १९२९ मध्ये ‘फर्स्ट बॅरन बेडन-पॉवेल ऑफ गिलवेल’ (गिलवेल हे इंग्लंडमधील बालवीर शिक्षणाचे जागतिक केंद्र आहे) होण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांच्या बहुमोल कार्याबद्दल १९३९ मध्ये त्यांचे नाव शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी सुचवले होते; परंतु दुसऱ्या जागतिक युद्धामुळे ते दिले गेले नाही.

बेडन-पॉवेल यांनी आपल्या आईला लिहिलेली २,००० हून अधिक पत्रे अतिशय महत्त्वाची आहेत. त्यांची काही चित्रे व कलाकृती इंग्लंडमध्ये ‘गिलवेल पार्क’ ह्या शिक्षण केंद्रात जतन केलेल्या आहेत. केन्यामधील न्येरी येथे त्यांचे निधन झाले.बेडन-पॉवेल यांची उल्लेखनीय पुस्तके पुढीलप्रमाणे : स्काऊटिंग फॉर बॉईज (१९०८), माय ॲडव्हेंर्चस ॲज अ स्पाय (१९१५), गर्ल गाइडिंग (१९१७), व्हॉट स्काऊट्स कॅन डू (१९२१), स्काऊटिंग अँड यूथ मुव्हमेंटस् (१९२९), लेसन्स ऑफ अ लाइफ टाइम (आत्मचरित्र - १९३३), आफ्रिकन ॲडव्हेंचर्स (१९३६), पॅडल युवर ओन कॅगो (१९३९).

 (स्रोत : मराठी विश्वकोश)

Saturday, 10 March 2018

🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔭
**************************
*फलज्योतिष विज्ञानाच्या कसोटीवर*
__________________________________

*बार्मन इफेक्ट*

'बार्मन आणि बेली' या सर्कसचा मालक पी.टी. बार्मन म्हणत असे की आमची सर्कस लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना आवडते. कारण आमच्या सर्कसमधील कोणता ना कोणता खेळ प्रत्येकाच्या आवडीचा असतो. फलज्योतिषाचे निदान सर्कशी सारखे असते. त्यात पुरेसा मोघमपणा असे असतो. भाषेमध्ये संदिग्धता असते आणि मांडणी व्यापक, सर्वस्पर्शी असते, म्हणून प्रत्येकाला ती पटते. प्रसंगी आपलेच कसे बरोबर होते, हे गोलमाल भाषा वापरून पटवून देता येते.

बार्मनची पद्धत वापरून तयार केलेले व्यक्तिचित्र कसे असते त्याचा नमुना पाहा.

'तुम्हाला असे फार वाटते की, लोकांना आपण आवडावे, लोक आपली प्रशंसा करोत. आपल्या गुणांची कदर करोत. तुम्ही स्वतःच कडक परीक्षण करता. तुमचा उत्कर्ष होईल. तो घडवून आणण्याची क्षमता असलेले पण पूर्ण वाव न मिळालेले गुण तुमच्यात आहेत. तुम्ही काही बाबतीत कमी पडत असाल, पण त्यावर तुमच्याकडे तोडगे आहेत. बाहेरून जरी तुम्ही शिस्तबद्ध आणि स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत असला, तरी आतून तुम्हाला कधी कधी चिंता भेडसावतात आणि असुरक्षितता जाणवते. कधी कधी तुम्हाला शंका वाटते की आपण योग्य निर्णय घेतला का ? मधूनमधून तुम्हाला बदल हवा असतो. जीवनात विविधता हवी असते. चाकोरीबद्ध जीवनाचा कधी कधी तुम्हाला उबग येतो. तुम्हाला अभिमान आहे कि तुम्ही स्वतंत्रपणे विचार करता आणि दुसऱ्यांची विधाने परीक्षणाशिवाय मानीत नाही. तुम्ही पूर्णपणे कोणाजवळही मन मोकळे करत नाही. कधी कधी तुम्ही खुशीत, बहिर्मुख, मनमिळावू असता; तर कधी विमनस्क आणि अंतर्मुख. तुमच्या काही आकांक्षा अवास्तव असतील, पण एकंदरीत आयुष्यात सुरक्षितता तुम्हाला हवी असते.'

पत्रिका पाहून वरीलप्रमाणे निदान जर केले, तर ते कोणालाही पटण्याजोगे आणि लागू पडणारे असते. कारण खरोखर त्यात विशेष काहीच म्हटलेले नसते, हे जरा विचार केल्यावर ध्यानात येते. जर फलज्योतिषात खरोखरच बिनचूक भाकीत करायची यंत्रणा असेल तर एखाद्या व्यक्तीचे त्याची पत्रिका पाहून रेखाटलेले व्यक्तिचित्र बार्मन इफेक्ट पेक्षा अधिक बिनचूकपणे त्या व्यक्तीला लागू पडायला पाहिजे.

वास्तविक मंगळ, गुरु, शनी अादी ग्रह खनिजे, पाषाणे अथवा वायूपासून बनलेले अचेतन निर्जीव ग्रह आहेत. मंगळ पृथ्वीपासून सुमारे आठ कोटी किलोमीटर दूर आहे, गुरु त्रेसष्ट कोटी किलोमीटर तर शनी १२८ कोटी किलोमीटर इतका प्रचंड दूर आहे. आठ कोटी किलोमीटर दूर व अंतराळात लाखो वर्षे सूर्याभोवती फिरत असलेला मंगळ पत्रिकेत १, ४, ७, ८, १२ या स्थानांवर येऊन पृथ्वीवरील पाचशे कोटी लोकांपैकी केवळ ज्योतिष मानणाऱ्या भारतातल्या काही मुलींच्या मार्गात 'रास्ता रोको' आंदोलन काय करतो, ६३ कोटी किलोमीटर वरचा प्रचंड परंतु अचेतन गुरु वक्री होऊन पृथ्वीवरल्या काही ठराविक विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे काय आणतो आणि तो सव्वाशे कोटी किलोमीटर दूरचा शनी, त्याच्या ३० वर्षांच्या प्रदक्षिणा काळात, भारतातल्या काही लोकांच्या मानगुटीवर बसून फक्त साडेसात वर्षेच धिंगाणा काय घालतो, साराच बनवाबनवीचा मामला !

वरील सर्व विस्तृत मांडणीचा मतितार्थ एवढाच की, फलज्योतिष हे असेलच तर स्वप्न विकण्याची कला आहे. स्वप्ने विकत घेणे हे प्रत्येकाला आवडते आणि 'मी स्वप्ने विकत आहे' असे प्रामाणिकपणे कोणी म्हणाला, तर त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहताही येते; परंतु फलज्योतिष ज्यावेळी विज्ञानाचा दावा करते आणि प्रत्यक्षात दैववादी विचारांच्या साखळदंडाने व्यक्तीला जेरबंद करते, त्यावेळी त्याचा प्रतिवाद आणि प्रतिकार दोन्हीही करावयालाच हवा.

या देशात अाधिच दैववादी असलेल्या माणसांना आणखी दैववादी बनवणे आणि वर त्याला विज्ञानाचा मुलामा देणे या गुन्ह्याला प्रबोधनाच्या क्षेत्रात तरी कधीही क्षमा करता कामा नये.

*क्रमश:*

*तिमिरातूनी तेजाकडे* या पुस्तक
🕊 *कबुतर नेमकी घराकडे कशी परततात ?* 🕊
************************************

सर्वच जातीच्या कबुतरांकडे क्षमता नसली, तरी रॉक पिजन्स या नावानं ओळखल्या जाणाऱ्या एका जातीच्या पक्षांमध्ये दूर दूर अंतरावरुनही नेमका आपल्या घरट्याचा वेध घेण्याची विलक्षण क्षमता असते. म्हणूनच पोस्टाचा उदय होण्यापूर्वीच्या काळात दूर अंतरावर काही संदेश पाठविण्यासाठी दूत म्हणून कबुतरांचा वापर केला जात होता. चंगीझ खानानं यांचा वापर केल्याचे उल्लेख सापडले आहेत. अठराव्या, एकोणीसाव्या शतकांमध्ये तर त्यांचा वापर युद्धामध्येही केला गेला होता. न्यूझीलंडमध्ये १८९८ पासून पंधरा वर्ष कबुतरांमार्फत हवाई टपालही पाठवलं जात होतं. राॅयटर्स या वार्तासंस्थेचा प्रणेता पॉल राॅयटर यानं १८६० मध्ये ब्रसेल्स आणि आखन बेल्जियममधील दोन शहरांमध्ये बातम्या आणि शेअरच्या किमतीविषयीची माहिती पुरवण्यासाठी ४५ कबुतरांची फाैज बाळगली होती. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातही लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल काही कबुतरांना मानाची पदकंही बहाल करण्यात आली होती. एवढंच काय पण एकविसाव्या शतकातही त्यांचा उपयोग झाला आहे. २००२ साली वादळ आणि पूर यानं त्रस्त झालेल्या ओरिसा राज्यात महत्त्वाचे संदेश वेळेवर पोहोचवण्यासाठी कबुतरांना कामाला लावण्यात आलं होतं.

पण ही कामगिरी हे पक्षी नेमकी कशी पार पाडतात याविषयी निर्णायक माहिती मिळालेली नाही. नकाशा आणि होकायंत्र यांचा वापर करून जसे नाविक भर समुद्रातून नौका चालवतात, तशाच तंत्राचा वापर हे पक्षी करतात असंच समजलं जात आहे. आजवरच्या संशोधनातून नकाशासाठी हे पक्षी काही ठळक ठिकाणांचा म्हणजे लँडमार्कचा वापर करताना हे दिसून आलं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांची उंची व त्यांचं एकमेकांशी असलेलं अंतर यांचं भान पक्ष्यांना असतं हे दिसून आलं आहे. मात्र होकायंत्र म्हणून ते कशाचा वापर करतात याविषयी मतभिन्नता आहे. काहींच्या मते ते सूर्यप्रकाशाचा वापर करतात त्यांच्या डोळ्यांच्या खास रचनेमुळे सूर्यकिरणांची दिशा निरनिराळ्या ठिकाणांची त्यांचा होणारा कोन याचं भान या पक्ष्यांना होतं. तर इतर काहींच्या मते पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा वापर या पक्ष्यांकडून होत असतो. त्यांच्या मस्तकातील एका खास मज्जातंतूंमध्ये चुंबकीय क्षेत्राला प्रतिसाद देण्याची क्षमता आहे आणि त्याचा वापर करून ते आपली वाट शोधत असतात.

पण प्रत्यक्ष प्रयोग केले गेले तेव्हा या पक्ष्यांच्या एका जातीला या चुंबकीय क्षेत्रातील काही विसंवाद ओळखता आले, कारण त्यानुसार त्यांनी आपला मार्ग बदलल्याचं दिसलं; पण दुसऱ्या जातीच्या पक्ष्यांना त्या विसंवादाचा थांगपत्ताही लागला नाही. त्यामुळे दोन्ही प्रक्रियेचा अवलंब हे पक्षी वाट शोधण्यासाठी करत असावेत असा अंदाज वर्तवला गेला आहे.

*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून*


*विल्हेल्म राॅंटजेन*
*Wilhelm Röntgen*

*क्ष-किरण (x-ray) संशोधक*

*स्मृतिदिन - १० फेब्रुवारी १९२३*

क्ष-किरण
हे एक प्रकारचे विद्युतचंबकीय विकीरण असतात. यांची तरंगलांबी ०.०१ ते १० नॅनोमीटर पर्यंत असते. वारंवारिता ही ३० पेंटाहर्ट्झ ते ३० एक्साहर्ट्झ इतकी असते. क्ष-किरणांची तरंगलांबी गॅमा किरणांपेक्षा कमी व अतिनिल किरणांपेक्षा जास्त असते.
शोध
विल्यम राँटजेनने क्ष-किरणांचा शोध लावला असे मानले जाते, परंतु क्ष-किरणांवर संशोधन आधीपासून चालु होते. फक्त विल्यम राँटजेनने त्याची माहिती व्यवस्थितपणे विस्तृत केली. विल्यम राँटजेनच्या आधी जोहॉन हित्रोफ, Ivan Pulyui, नोकोला टेस्ला, फरर्नंडो सॅनफोर्ड, फिलिप लेनार्ड यांनी यावर संशोधन केले होते. १८९५ मध्ये विल्यम राँटजेन याने प्रयोगशाळेत अल्फा किरणांचा अभ्यास करताना असे आढळून आले की काही न वापरलेल्या फोटोग्राफिक प्लेट काहीही न करता खराब झाल्या होत्या. त्यावेळी असे निदर्शनास आले की काही किरणे न दिसता असतात व ते वस्तूंच्या आरपार जातात. त्यांचे नामकरण 'क्ष' केले गेले.
उपयोग
वैद्यकीय
क्ष-किरण प्रतिमा घेण्याची पद्धती
वैद्यकीय व्यवसायात हाडांचे प्रतिमा (फोटो) घेण्यास याचा उपयोग होतो. आधुनिक निदान पद्धतीमध्ये वापरले जाणारे क्ष-किरण यंत्रणांमध्ये किरणोत्साराचा वापर होतो. शरीर न फाडता आतल्या हाडाला झालेली इजा क्ष-किरण प्रतिमेने तपासता येते.
सीटी स्कॅन
सीटी स्कॅनचे यंत्र
सीटी स्कॅनच्या साहाय्याने क्ष-किरणांचा वापर करून शरीराच्या आतील अवयवांची प्रतिमा मिळवली जाऊ शकते. जिथे नेहमीची क्ष-किरण प्रतिमा मिळू शकत नाही,(उदा. मेंदू) तिथे हाडांना भेदून अवयवांचे त्रिमिती प्रतिमा सीटी स्कॅनच्या साहाय्याने मिळू शकते.
अँजिओग्राफी
ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये क्ष-किरणांद्वारे दिसणारे रंग सोडून रक्तवाहिन्यांची भरण क्षमता तपासली जाते. याद्वारे रक्त वाहिन्यांतील अडथळे दिसून येतात.
संरक्षक
विमानतळावर किंवा इतर संवेदनशील ठिकाणी स्फोटकांची तपासणी करता क्ष-किरणांचा वापर केला जातो.
अंतराळ संशोधन
धूमकेतूचे क्ष-किरण छायाचित्र
चंद्रा दुर्बिणीमध्ये अंतराळात क्ष-किरण प्रतिमा प्राप्त करून संशोधन केले जाते.
औद्योगिक
औद्योगिक वापरा मुख्यतः धातूंचे जोडांतील छिद्रे शोधण्याकरिता वापर केला जातो.
हानीकारक घटक
क्ष-किरणाचा शोध लागून शंभराहून अधिक वर्षे झाली त्यांच्या किरणोत्साराची हानी कमी करण्याचे तंत्र विकसित झाले. पण तरीही त्याचा धोका गर्भवतीला किवा वाढत्या वयाच्या बालकांना अजूनही आहेच.


🌲 *उंच झाडांच्या शेंड्यांपर्यंत पाणी कसं पोहोचतं ?* 🌲
************************************

साधं पाच दहा मीटर खोल असलेल्या विहिरीतून पाणी काढायचं तर विजेचा पंप बसवावा लागतो. दोन तीन मजल्यांच्या इमारतीच्या गच्चीवरची टाकी भरायची तरी पंपाच्या मदतीविना ते शक्य होत नाही. मग ताडमाड उंच असलेल्या माडाच्या शेंड्यापर्यंत त्याच्या मुळांशी घातलेलं पाणी कसं पोहोचतं ? जंगलांमध्ये देवदारसारखे वृक्ष तर सहज शंभर मीटर उंची गाठतात. त्यांनाही मुळाजवळचं पाणी पुरतं.

हे शक्य व्हावं अशी व्यवस्था निसर्गानेच करून ठेवली आहे. निसर्गाच्या दोन करामतींचा यात वाटा आहे. पहिला म्हणजे या झाडांमध्ये झायलेम या नावानं ओळखल्या जाणाऱ्या द्रववाहिन्याच असतात. आपल्या शरीरात कशा रक्तवाहिन्या असतात तशा या झाडांच्या जीवनवाहिन्याच असतात. त्यांचा घेर साधारण एका मिलिमीटरच्या एक दशांश इतकाच असतो. मुळांची घातलेलं पाणी या नलिकांमधून वर चढत जातं. पाण्याने भरलेल्या ग्लासामध्ये एखादी स्ट्राॅ किंवा काचेची बारीकशी नवी ठेवली तर तिच्यातही असं पाणी वर चढत जाताना दिसतं. यालाच केशाकर्षण किंवा कॅपिलरी अॅक्शन असं म्हणतात. त्यात झाडांच्या पानांमधून पाण्याचं बाष्पीभवन होत असल्यानं भरच पडते. आपल्याला जसा घाम येतो तर आणि अंगातल्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन ते हवेत उडून जातं, तसच झाडांच्या पानांमधून पाणी बाहेर पडून ते उडून जात असतं त्यामुळे पानांजवळ पाण्याचं प्रमाण अतिशय कमी असतं. उलट मुळांपाशी ते कितीतरी जास्त असतं. त्यामुळे एकप्रकाराचा पंप तयार होऊन मुळांपासून पानांपर्यंत असा पाण्याचा एक प्रवाहच तयार होतो. त्यापायी त्या नलिकांमधून पाणी वर ओढलं जातं. पार शेंड्यापर्यंत पोहोचतं.

तसं व्हायला पाण्याच्या आणखी एका गुणधर्माचीही मदत होते. पाण्यात रेणू एकमेकांना घट्ट धरून राहणारे असतात. इतर कोणत्याही रेणूंपेक्षा ते आपल्याच रेणूंची जवळीक सांधणं, घसट ठेवणं पसंत करतात. त्यामुळे या नलिकांच्या आतल्या अंगाला चिकटलेले पाण्याचे रेणू इतरांना आपल्या जवळ करण्याचे प्रयत्न करतात. त्यांना खेचून घेतात. त्यामुळेही पाणी वर वर चढत जातं. त्याचा जो एक प्रवाह तयार होतो त्यामुळे पाण्याचा एक खांबच जणू तिथं उभा राहतो. त्या पाण्यात विरघळलेले इतर पदार्थही मग त्या पाण्याबरोबर वरवर चढत राहतात. झाडाचं पोषण करणारं अन्नही त्याला भरवतात.

पावसाचं पाणी त्या झाडाच्या शेंड्यावर पडतं; पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. कारण पानं ते पाणी शोषून घेऊन आतवर ओढून घेऊ शकत नाहीत. मुळांजवळ साठलेलं पाणीच वरवर चढत राहतं.

*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून*


📙 *व्यक्तीचं वय कसं ओळखतात ?* 📙

बीजिंग येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक सामन्यांच्या वेळी जिम्नॅस्टिक्स स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या चीनी मुलींच्या वयासंबंधी वाद निर्माण झाला होता. ऑलिंपिक सामन्यांच्या घटनेनुसार १६ वर्षांपेक्षा लहान व्यक्तीला सामन्यात भाग घेता येत नाही; आणि काही चिनी मुलींचं व त्यापेक्षा कमी असल्याची शंका इतर देशातील स्पर्धकांनी किंवा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. चिनी व्यक्तीची चण पाश्चात्यांपेक्षा लहानखुरी असते; पण ते ध्यानात घेऊनही काही मुली १६ वर्षांच्या असणार शक्य नव्हतं.

स्त्रियांच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्या जिंकणाऱ्या रशियन किंवा पूर्व जर्मनीच्या मुलींबद्दलही त्या आधीच्या ऑलिंपिक सामन्यांच्या वेळी त्या स्त्रियाच आहेत की काय अशी शंका उत्पन्न केली गेली होती; आणि त्याचा निवाडा त्या मुलींच्या रक्तातील पेशी घेऊन त्यातील गुणसूत्रांच्या आधारावर केला गेला होता. तसंच एखादी स्पर्धा जिंकणाऱ्या व्यक्तींना अधिक ताकद मिळवण्यासाठी किंवा स्नायूंची मूलभूत क्षमता वाढविण्यासाठी उत्तेजक पदार्थ घेतले आहेत की नाही याचाही निवाडा वैज्ञानिक चाचण्या घेऊन केला गेला आहे. त्याच्याच आधारे बेन जॉन्सनचं सोल ऑलिम्पिकमधलं १०० मीटर धावण्याच्या शर्यतीतलं विजेतेपद हिसकावून घेतलं होतं.

तशाच प्रकारे चिनी मुलींच्या वयाचा प्रश्नही सोडवता येईल का ? असा सवाल केला गेला होता. गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना मदत करणारे वैज्ञानिक, कलेवराच्या हाडांची आणि दातांची परीक्षा करून त्यावरुन त्या मृत व्यक्तीचं वय ओळखतात. कारण आपल्या कवटीच्या मध्यभागी दोन बाजूंची सपाट हाडं शिवल्यासारखी सांधली जातात. या शिवणीचं स्वरूप पाहून त्या व्यक्तीचं वय ओळखता येतं. तसंच बरगड्या जिथे मधल्या हाडाला जोडल्या जातात तिथल्या बरगड्यांच्या टोकाची तपासणी करूनही वयाचा अंदाज बांधता येतो. कारण सुरुवातीला ही टोकं पसरलेली आणि गोलसर असतात; पण जसजसं वय वाढत जातं तसतशी वापरामुळेही टोकं खडबडीत होऊ लागतात.

जन्म होण्यापूर्वी आईच्या पोटात असल्यापासूनचं वय व्यक्तीच्या हाडांची तपासणी करून ओळखण्याची पद्धत या वैज्ञानिकांनी विकसित केली आहे. त्यानुसार निरनिराळ्या वयात निरनिराळ्या हाडांच्या वैशिष्टय़ांचा उपयोग होतो.

तसंच निरनिराळे दात येण्याचं वयही निरनिराळं असतं. दुधाचे दात साधारणत: सहाव्या महिन्यांपासून यायला सुरुवात होते. ते पडून जे जेव्हा पक्के दात येतात त्यांचा कालखंडही वेगवेगळा असतो. अक्कल दाढ तर विसाव्या वर्षांनंतर येते. तरीही या सर्व दातांच्या जडणघडणीची तयारी जन्मल्यापासूनच होत असते, त्यामुळे त्या दातांच्या स्थितीवरून व्यक्तीचं वय ओळखणं शक्य होतं.

पण या सर्व चाचण्या अचूक वयनिदान करू शकत नाहीत. त्या चाचण्यांवरून केलेलं निदान दोन वर्षांनी चूक असू शकतं. म्हणजेच या चाचण्यांमधून एखाद्या चिनी मुलीचं वय सोळा आहे असा निष्कर्ष काढला गेला असेल, तर तिचं वय चौदा ते अठरा या पट्ट्यात असू शकतं. म्हणजेच सोळा असं जिच्या वयाचं निदान झालं आहे अशी मुलगी प्रत्यक्षात चौदा वर्षांची असू शकते.

*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून*

🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔭
**************************
*मन मनाचे आजार: भूताने झपाटने, देवीचे अंगात येणे*
__________________________________

*मनाचे स्वरूप*

माणसाची वागणूक म्हणजेच माणसाच्या भावना, विचार आणि आचार या तिघांचा अभ्यास म्हणजेच त्याच्या मनाचा अभ्यास. या गोष्टीचे नियमन मन या संस्थेद्वारे होते. एक उदाहरण घेऊ. सरकार म्हणजे काय, असा प्रश्न विचारला तर, लोकप्रतिनिधी, प्रशासन, न्याययंत्रणा, सैन्य अशी अनेक उत्तरे येतील. यांतील प्रत्येक उत्तर अंशत: बरोबर आहे. प्रत्यक्षात या आणि अशाच इतर अन्य बाबी मिळून सरकार बनते. त्याचप्रमाणे माणसाची बुद्धी, भावना, वासना, स्मरणशक्ती, कल्पना, जाणीव व या स्वरूपाच्या अन्य अनेक अभिव्यक्ती यांमधून व्यक्तीचे मन मन बनते. माणसाच्या मेंदूत सुमारे एक हजार कोटी मज्जापेशी असतात. विद्युत रासायनिक स्पंदनांनी त्या एकमेकींशी जोडलेल्या असतात. माणसाचे मन मेंदूतच, म्हणजेच या मज्जापेशी, त्यांच्यातील विद्युत रासायनिक स्पंदने यांमध्ये असते. मेंदू हा माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळा बनवणारा अवयव आहे. त्याची रचना पद्धती आणि कार्यपद्धती अतिशय गुंतागुंतीची आहे. उत्क्रांतीत अगदी खालच्या स्तरावरील प्राण्याचा मेंदू हा फक्त जीवनाला अतिशय आवश्यक असे श्वसन, हृदयाची स्पंदने यांचे नियंत्रण करतो. उत्क्रांतीत प्राणी जसजसा वरच्या स्तरावर पोचतो, तसतसे मेंदूचे कार्य अधिक गुंतागुंतीचे आणि प्रगत होत जाते. पुढच्या टप्प्यावर हा मेंदू श्वास घेणे व हृदयाची स्पंदने यानंतर स्वरक्षण, क्रोध, प्रतिक्षिप्त क्रियांचे नियंत्रण आदी करत कार्य करू लागतो. मानवाच्या स्तरावर पोहोचलेल्या मेंदूच्या दृष्टीने मात्र ही कार्ये अगदीच प्राथमिक म्हणावी लागतील. माणसात अधिक प्रगत विचार, भावना, सद्सदविवेकबुद्धी ही त्याच्यातील मेंदूच्या प्रगतीमुळेच निर्माण झालेली असते. नैसर्गिक उर्मींवर नियंत्रण ठेवता येण्याची क्षमता केवळ प्रगत मेंदूत असते. सर्व प्राण्यांच्या मेंदूच्या रचनेचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की अप्रगत अवस्थेतील प्राण्यांचा मेंदू हा मनुष्याच्या मेंदूत जो ब्रेनस्टेम नावाचा भाग असतो, त्यासारखाच असतो. मानवाच्या मेंदूतही श्वसन व हृदयाची स्पंदने यांचे केंद्र असते. पण हा भाग मानवाच्या मेंदूत थोड्या प्रमाणात असतो. प्राण्याच्या भावना आणि विचार जसजसे विकसित होत गेले, तसतसे मेंदूचा इतर भाग, फ्राँटललोब, प्री-फ्राँटललोब, लिंबिक सिस्टीम हा भाग, मेंदूची जास्तीत जास्त जागा व्यापू लागतो आणि त्यामुळे 'मनुष्य प्राण्याचा' मेंदू तयार होतो. म्हणजे माणसाच्या भावना, विचार व आचार यांचे नियंत्रण करणारा हा भाग माणसाच्या मेंदूत इतर प्राण्यांच्या मानाने सगळ्यात मोठा असतो. मनाच्या प्रक्रिया जास्तीत जास्त या 'नूतन मेंदू'च्या द्वारेच नियंत्रण होत असतात. मेंदूतील असंख्य पेशी एकमेकींना जोडलेल्या असतात. त्यांना सायनाप्सेस म्हणतात. याआधारे जोडल्या गेलेल्या चेतासंस्थेच्या पेशींचे एक महाप्रचंड जाळे मेंदूत असते. त्याच जाळ्यावाटे संपूर्ण शरीरभर संदेश पाठवणे चालते व त्याद्वारेच सर्व ग्रंथी, अवयव, स्नायू यांच्यावर नियंत्रण ठेवले जाते. या नियंत्रणात पेशींच्या परस्परजोडाचा म्हणजेच सायनाप्सेसचा फार मोठा वाटा असतो. या सायनाप्सेसमध्ये सिरोटोनीन, इपीनेफ्रिन, नाॅरइपीनेफ्रीन, गॅबा अशी विविध प्रकारची रसायने असतात. अंतर्जोडामध्ये ही रसायने किती प्रमाणात असतात, यावर संदेशवहनाचे कार्य अवलंबून असते. या रसायनांचा समतोल बिघडला की संदेशवहनाचे काम विस्कळीत होते. मेंदूच्या त्या भागाकडून नियंत्रित होणाऱ्या भावना व विचार यात दोष निर्माण होतो. उदाहरणार्थ सिरोटोनीनमुळे मनाला शांत वाटते, पण ते ज्यादा झाल्यास भ्रम तयार होतात. डोपामाईन शारीरिक हालचाल मेंदूच्यामार्फत नियंत्रित करते, त्याची पातळी कमी झाली तर पार्किन्सन्स हा रोग होतो.

*क्रमशः*

*तिमिरातुनी तेजाकडे* या पुस्तकातून


*मेघनाथ साहा*

*तार्‍यांचे तापमान आणि आयनीभवन यांचा संबंध स्पष्ट करुन सिद्धांत मांडणारे भारतीय वैज्ञानिक*

*स्मृतिदिन - १६ फेब्रुवारी १९५६*

साहा, मेघनाद : (६ ऑक्टोबर १८९३–१६ फेब्रुवारी १९५६). भारतीय भौतिकीविज्ञ. त्यांनी ऊष्मीय आयनीकरणाचे समीकरण मांडून त्यांचा उपयोग तारकेय वर्णपटांच्या स्पष्टीकरणार्थ केला. खगोल भौतिकीतील या महत्त्वाच्या कार्याकरिता ते प्रसिद्घ होते.

साहा यांचा जन्म डाक्का जिल्ह्यातील सिओरात्तली (आता बांगला देश) येथे झाला. त्यांनी कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजात प्रफुलचंद्र रॉय व सर जगदीशचंद्र बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊन १९१५ मध्ये एम्. एस्‌सी. आणि नंतर सापेक्षता सिद्घांत व प्रारण दाबाचे मापन या विषयांवर संशोधन करून पीएच्. डी. पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी लंडनच्या इंपिरियल कॉलेजमध्ये संशोधन करून डी. एस्‌सी. पदवी मिळविली. ते कोलकाता विद्यापीठात भौतिकी विषयाचे खैरा प्राध्यापक (१९२१–२३), पलित प्राध्यापक (१९३८–५२) आणि गुणश्री प्राध्यापक (१९५२–५६); तसेच अलाहाबाद विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक (१९२३–३८) होते.
 
मेघनाद साहासाहा यांनी आणवीय सिद्घांत आणि पुंजयामिकी यांमधील तत्त्वांचा वापर करून तारकेय वर्णपटांच्या चित्रलिपीचा सांकेतिक अर्थ शोधून काढण्याकरिता सर्वप्रथम प्रयत्न केला. तारकेय वातावरणातील तापमानाला (६,०००° से. किंवा अधिक) ताऱ्याचे घटक असलेल्या पुष्कळशा अणूंच्या बाह्य कवचातील इलेक्ट्रॉन छेदले जातात. या आणवीय छेदन प्रक्रियेला इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे आयनीकरण म्हणतात आणि छेदित अणूला आयन (विद्युत्‌भारित अणू)म्हणतात. अशा प्रकारे तारकेय वातावरणात मुक्त इलेक्ट्रॉन आणि छेदित अणू यांचे वायुमय मिश्रण असते. साहा यांनी या मिश्रणास वायूचा गत्यात्मक सिद्घांत आणि ऊष्मागतिकी यांचे नियम लावले.

कोणत्याही मूलद्रव्याच्या अणुंकरिता छेदन किंवा आयनीभवन केवळ उच्च तापमानामुळे घडून येत नसून ते नीच दाबामुळे सुद्घा घडते, हे साहा यांनी सप्रमाण सिद्घ केले. दाबातील न्यूनीकरणामुळे छेदन झाल्यानंतर उरलेला अणू आणि मुक्त इलेक्ट्रॉन यांची गाठ पडण्याची संधी अधिक कमी होते आणि पुनःसंयोग होण्याचा वेग कमी होऊन आयनीकरण वेग बदलत नाही.

साहा समीकरणामुळे दिलेल्या दाबाला व तापमानाला तारकेय वातावरणातील आयनीभवनाच्या परिमाणाची आकडेमोड तसेच अणूपासून उत्तरोत्तर इलेक्ट्रॉन वेगळा काढण्याकरिता लागणाऱ्या ऊर्जेची आकडेमोड शक्य झाली. अशा प्रकारे साहा समीकरण तारा आणि अणू यांच्या मूलभूत संबंधाविषयीची पहिली सूत्ररूप मांडणी आहे. साहा यांनी १९२० मध्ये ‘ सूर्याच्या वर्णमय आवरणातील आयनीभवन’ या विषयावरील एक निबंध फिलॉसॉफिकल मॅगझीनमध्ये प्रसिद्घ केला. रेडिओ तरंगांचे प्रेषण, ज्योतींचे संवहन, प्रज्योत आणि स्फोटक विक्रियांची रचना यांमधील समस्या सोडविण्याकरिता साहा यांचा आयनीभवन सिद्घांत उपयुक्त ठरला आहे.

साहा यांनी कोलकाता येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स’ ही संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला. ते या संस्थेचे सन्माननीय संचालक होते. त्यांच्या मृत्यूनंतर या संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले. ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो होते (१९२७). भारतीय विज्ञान परिषद संस्थेच्या एकविसाव्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते (१९३४). १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार म्हणून ते लोकसभेवर निवडून आले होते. आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांनी आपले लक्ष विज्ञानाच्या सामाजिक कार्याकडे वळविले.

साहा यांनी लिहिलेले ग्रंथ असे : ए ट्रीटाइज ऑन द थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी; ऑन ए फिजिकल थिअरी ऑफ द सोलर करोना; ए ट्रीटाइज ऑन हीट; ए ट्रीटाइज ऑन मॉडर्न फिजिक्स  आणि माय एक्सपिरिअन्सेस इन रशिया. १९३५ मध्ये त्यांनी इतिहास, संस्कृती व विज्ञान यांना वाहिलेले सायन्स अँड कल्चर  हे नियतकालिक सुरू केले.

साहा यांचे दिल्ली येथे निधन झाले.

📙 *आपल्याला वासांची आठवण कशी राहते ?* 📙
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

डोळे, नाक, त्वचा, कान आणि जीभ या आपल्या पंचेंद्रियांकडून आपल्या आसपासच्या जगाविषयीची माहिती मिळत असते. या इंद्रियांचे बाह्य भागांमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या संवेदनांचं ग्रहण करण्याची शक्ती असते. म्हणजे डोळे प्रकाशलहरींच्या रूपात येणाऱ्या संवेदनांना दाद देतात. कान ध्वनीलहरींना प्रतिसाद देतात. तसंच नाक हे निरनिराळ्या गंधांना दाद देतं.

संदेश कोणत्याही रूपातला असला की त्याला दाद देणाऱ्या ग्राहक पेशी तो संदेश त्यांच्याशी जोडलेल्या मज्जातंतुंकडे सोपवतात. तिथं त्या संदेशाचं विद्युतरासायनिक लहरींमध्ये रूपांतर होतं आणि तो संदेश मेंदूतल्या विवक्षित केंद्राकडे पोहोचतो. तिथं त्यांचं वाचन होऊन त्याची नोंद स्मरणकोशात ठेवली जाते. तसंच त्या क्षणी त्या संदेशाला दाद देणारा उलटा संदेश पाठवायचा असल्यास त्याचीही तजवीज केली जाते. स्मरणकोशात साठवून ठेवलेल्या त्या संदेशाच्या नोंदीचा वापर परत जेव्हा त्याच प्रकारचा संदेश येतो त्यावेळी केला जातो. त्या नोंदीच्या आधारावरून मग तो त्यापूर्वीही आल्याची जाणीव होते. म्हणजेच आपली आठवण जागी होते.

कोणताही वास म्हणजे गंध हा त्या पदार्थातून हवेत सहज उडून जाणाऱ्या रसायनांच्या रूपात वावरत असतो. न्हाणीघराच्या कोपऱ्यात ठेवलेली रूम फ्रेशनरची वडी तिथलं वातावरण सुगंधित करते, कारण त्या वडीतून उडून जाणारे त्या गंधाच्या रसायनांचे रेणू हवेत वावरत असतात. त्यांचा संयोग आपल्या नाकामधल्या त्या रसायनांना दाद देणाऱ्या ग्राहक रेणूंशी होतो. तसा तो झाला की मग त्यापायी निर्माण झालेला विद्युतरासायनिक स्पंद मेंदूकडे पोहोचतो. स्मृतीकोशात साठवून ठेवला जातो.

सुगंध विविध असतात. मात्र त्या सुगंधाच्या रसायनांमध्ये एकाहून अधिक रेणू असू शकतात. तसंच या रसायनांचे रेणू मोठ्या आकाराचे असू शकतात. त्यात वेगवेगळे घटक असू शकतात. त्या निरनिराळ्या घटकांना दाद देणारे निरनिराळे ग्राहक रेणू नाकाच्या पेशींमध्ये असतात. त्यांना अोलफॅक्टरी रिसेप्टर्स म्हणतात. त्यांच्याकरवी मिळालेले संदेश स्मृतिकोशात साठवलेले असतात. नव्यानं जेव्हा एखाद्या सुगंधी रसायनाचे रेणू हवेत विहरत आपल्या नाकपुड्यांमधल्या या ग्राहक रेणूंशी दंगामस्ती करू लागतात, तेव्हा त्या निरनिराळ्या घटक रेणूंनी चाळवलेले मज्जातंतु मेंदूकडे ती माहिती पोहोचवतात. त्या माहितीच्या तुकड्यांचं एकत्रीकरण करून मेंदू त्या सुगंधाची आठवण जागवतो. म्हणून तर उडतउडत आलेला सोनचाफ्याचा सुवास केवळ त्या गंधाचीच नव्हे, तर त्या गंधाशी निगडित असलेली दुसरी एखादी रम्य आठवणही जागवतो.

*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून*


📙 *पुरातन हाडांची ओळख कशी पटवतात ?* 📙

कधी कधी पोलिसांना एखाद्या ठिकाणी अनपेक्षितपणे काही पुरलेली हाडं सापडतात. पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी केलेल्या उत्खननात तर नेहमीच अशी हाडं सापडत असतात. ती कोणाची, म्हणजेच माणसाची की एखाद्या प्राण्याची हे ठरवण्याचे काम मग करावं लागतं; आणि प्राण्याचीच असली तर नेमक्या कोणत्या प्राण्याची याचाही छडा लावावा लागतो. माणसाच्या किंवा प्रायमेट्स म्हणजे वानर प्रजातीच्या प्राण्यांची हाडं इतर प्रजातीच्या प्राण्यांच्या हाडांपेक्षा वेगळी असतात. एक तर दोन पायांवर उभं राहण्यासाठी हाडांच्या रचनेत काही बदल व्हावा लागला. तसाच बदल कवटीच्या आणि हातापायांच्या बोटांच्या हाडांमध्येही दिसून येतो. त्यामुळे सापडलेली हाडं जनावरांची आहेत, पक्ष्यांची आहेत की प्रायमेट जातीच्या प्राण्यांची आहेत हे ओळखणं कठीण जात नाही.

पण इतर प्रायमेट प्राण्यांपासून माणसांची हाडं वेगळी ओळखायची तर माणसाच्या हाडांमध्ये काही वेगळेपण असण्याची आवश्यकता आहे. तशा अनेक वैशिष्ट्यांची ओळख आता पटली आहे. त्यांचाच वापर करून मग सापडलेली हाडं कोणाची आहेत याचा छडा लावला जातो.

सुरुवात कवटीच्या हाडापासूनच करायला हरकत नाही. माणसाचा मेंदू इतर वानरांच्या मेंदूपेक्षा फारच मोठा आहे. माणसाचा सर्वात जवळचा उत्क्रांतीतील पूर्वज चिम्पांझी याचा मेंदूही कितीतरी लहान होता. त्यामुळे चिंपांझीच्या कवटीचं घनफळ केवळ ४०० घनसेंटीमीटर असतं, तर माणसाच्या कवटीचं १४०० घनसेंटिमीटर. माणसाचे सुळे स्त्री आणि पुरुष दोघांतही लहान असतात पण चिंपांझी नराचे सुळे मादीपेक्षा मोठे असतात. चिंपांझी झाडांवर सहजगत्या चढू शकतात तसंच हाताच्या बोटांच्या पेरांवर तोल सांभाळत चालू शकतात. त्यामुळे चिंपांझीच्या हाताच्या बोटांची हाडं माणसाच्या हाताच्या बोटांपेक्षा लांब असतात. माणुस आपला अंगठा समोरासमोरुन इतर बोटांना लावू शकतो. माणूसपणाचं हे एक खास लक्षण आहे. त्यामुळे माणसाच्या हाताच्या अंगठ्याचं हाड लांब असतं आणि त्यांच्या हालचालींसाठी तो अनेक स्नायूंना जोडण्याची व्यवस्था असते. चिंपांझींच्या खांद्याचे हाडं म्हणजे कॉलरबोन वरच्या दिशेला झुकलेली असतात. माणसाची सरळ किंवा खालच्या दिशेला झुकलेली असतात. ताठ उभं राहणं शक्य होण्यासाठी माणसाचा कणा वक्राकार असतो. चिंपांझीचा सरळसोट असतो. त्यामुळे दोन पायांवर उभा राहिला तरी तो ताठ होऊ शकत नाही. पोक आल्यासारखा वाकलेलाच राहतो. याच कारणासाठी माणसाच्या कमरेच्या हाडांमध्येही बदल झालेला आहे. शिवाय स्त्रियांमध्ये प्रसूतीच्या वेळी मुलाचं डोकं बाहेर यावं यासाठी ही हाडं एकमेकांपासून थोडी अलग होऊन तिथलं क्षेत्रफळ वाढु शकतं. त्यामुळे या हाडांचे सांधे लवचिक असतात. माणसाच्या पायांची बोटंही चिंपांझीच्या पायाच्या बोटांपेक्षा लहानखुरी असतात.

इतरही बारीकसारीक अनेक फरक आहेत. त्या सर्वांची परीक्षा करून मिळालेली हाडं माणसाचीच आहेत की नाहीत याचा निर्विवाद निवाडा करता येतो.

*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून*
🧠 *बुद्धिमत्ता कशी मोजतात ?* 🧠
***********************************

बुद्धिमत्तेचं मोजमाप ही एक अमूर्त कल्पना आहे. तरीही बुद्ध्यांकाच्या म्हणजेच इंटेलिजन्स कोशंटच्या रूपात बुद्धिमत्तेचं मोजमाप करण्यात येतं. त्यासाठी जी परीक्षा घेतली जाते तिच्यात अनेक प्रकारचे प्रश्न असतात. काही प्रश्न समस्यांवर मात करण्यासाठी मार्ग शोधण्याचे असतात. याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असे म्हणतात. मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्षात येणाऱ्या काही समस्या सोडवण्यासाठी कसा केला जातो याची परीक्षा या प्रकारच्या प्रश्नांमधून केली जाते. केवळ घोकंपट्टी करून साठवलेल्या माहितीवर विसंबून न राहता तिच्या मदतीने स्वतंत्र विचार करून त्या माहितीचा समोरच्या समस्येचा उलगडा करण्यासाठी तर्कशुद्ध मार्ग शोधण्याची क्षमता या परीक्षेतून तपासली जाते. काही प्रकारचे प्रश्न स्मरणशक्तीशी निगडित असतात तर इतर काही समोरच्या माहितीच्या ढिगाऱ्यातून निरनिराळे रचनाबंध शोधून काढून त्या माहितीचा अर्थ लावण्याच्या क्षमतेची परीक्षा घेतात. काही प्रश्न अाकलनक्षमतेची कसोटी पाहणारे असतात. काही प्रश्न सोडवताना किती वेळ घेतला गेला याचीही तपासणी केली जाते. त्यातून स्वतंत्र विचार करण्याच्या वेगाची तपासणी केली जाते. काही परीक्षापद्धतींमध्ये विशिष्ट वेळात विशिष्ट संख्येने प्रश्न सोडवायचे असतात, तर इतर काही परीक्षांमध्ये एका विशिष्ट गटातल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी घेतलेल्या वेळेचा विचार करण्यात येतो.

या सर्वांतून त्या विशिष्ट व्यक्तीचं मानसिक वय किती असेल याचा निवाडा करण्यात येतो. अल्फ्रेड बिने यानं आयोजित केलेल्या या परीक्षापद्धतीमध्ये मग या मानसिक वयाला शारीरिक वयानं भागून १०० नं गुणण्यात येतं. त्यातून मिळालेला आकडा हा त्या व्यक्तीचा बुध्यांक मानण्यात येतो. त्याच्या इंग्रजी नावांमध्ये इंटेलिजंस कोशंटमध्ये गुणोत्तर अभिप्रेत आहे. त्यानुसार मानसिक वय व शारीरिक वय यातील गुणोत्तर या परीक्षेतून काढण्यात येतं.

आता सुधारित पद्धतीमध्ये केवळ या अंकांवर विसंबून राहण्यात येत नाही, तर एखाद्या समाजातल्या बुद्ध्यांकाच्या वितरणाचा विचार केला जातो. एखाद्या घंटेसारख्या आकाराच्या या वितरणाला गॅास वितरण म्हणतात. त्याच्या मद्यावरच्या अंकाला १०० मानलं गेलं आहे. या शंभराच्या दोन्ही बाजूला ते वितरण पसरलेलं असतं. त्या वितरणात बिनेच्या पद्धतीनुसार मोजला गेलेला बुद्ध्यांक कुठलं स्थान पटकावतो हे बघून त्या व्यक्तीचा बुद्धय़ांक मोजण्यात येतो.

तरीही हे खरोखर बुद्धिमत्तेचे मोजमाप आहे कि काय याविषयी बराच वाद आहे. कारण हॉवर्ड गार्डनरनं दाखवून दिल्याप्रमाणे बुद्धिमत्ता भाषाविषयक, तार्किक, गणिती, अवकाशविषयक, शरीरविषयक, सांगीतिक, आत्मसंवादी व परीसंवादी अशा सात प्रकारची आहे; पण बुद्ध्यांक मोजण्याच्या परीक्षांमध्ये भाषाविषयक व तार्किक गणिती बुद्धिमंत्तांचीच कसोटी घेतली जाते. अलीकडच्या काळात त्यामध्ये रचनाबंध ओळखण्याची म्हणजेच मर्यादित प्रमाणात अवकाशविषयक बुद्धिमत्तेचीही चाचणी घेतली जाते; पण इतर बुद्धिमत्तांचा विचार या परीक्षांमध्ये केला जात नाही. त्यामुळे सर्वांच्याच बाबतीत बुद्ध्यांक हे बुद्धिमत्तेचं मोजमाप ठरू शकत नाही.

*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून*


🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔭

*मन मनाचे आजार: भूताने झपाटने, देवीचे अंगात येणे*

*भूत म्हणजे काय?*

भूताने झपाटणे अथवा भूत दिसणे या बाबीचे प्रामुख्याने दोन प्रकार करता येतात. एक म्हणजे भासाचे भूत आणि दुसरे म्हणजे मनोरुग्णतेतुन निर्माण झालेल्या वर्तनालाही भुताने झपाटले आहे असे मानले जाते. समाजातील सर्व वयोगटात, स्त्री पुरुषात शहरी ग्रामीण भागात, सुशिक्षित अशिक्षित, गरीब श्रीमंतांमध्ये भूत ही कल्पना आढळते. ही कल्पना कशी निर्माण होते ? या देशातील पारंपरिक विचार असे मानतो की, 'आत्मा' असतो. माणूस मेल्यावर हा आत्मा अतृप्त असेल, तर तो सूक्ष्म रूपाने सर्वत्र वावरतो. स्वतःच अतृप्त जीवनवासना पूर्ण करण्यासाठी तो कोणा ना कोण्या देहाची निवड करतो. त्या व्यक्तीला तो झपाटून टाकतो. भूतबाधेबद्दलचे ज्ञान आपणाकडे सर्वत्र आणि विपुल प्रमाणात मिळते. कुणाला कशी भूतबाधा होते आणि या पुस्तकातील मंत्राने ती कशी दूर करता येईल याची रसभरीत वर्णने अशा पुस्तकात असतात. भूत, प्रेत, पिशाच्चापासून मुक्ती हवी असेल तर, 'ऊ कं कल्याणं शोभनाभ्याम् न: ॥'  या मंत्राचा जप रोज १००८ वेळा करावा. भूताने झपाटलेल्याला म्हणता येत नसेल, तर त्याच्या शेजारी बसून एखाद्याने म्हणावा. मंत्र म्हणताना तांब्याच्या किंवा चांदीच्या भांड्यात पाणी ठेवून मंत्र म्हणून झाल्यावर कुलदैवताचे नाव घेऊन ते पाणी तीर्थ म्हणून प्यावे. टेपरेकॉर्डरवर हा मंत्र ब्राम्हणाच्या आवाजात टेप करून ऐकवला तरी चालेल. अशा भरपूर माहितीने ही पुस्तके खच्चून भरलेली असतात.

मरण कोणाला चुकत नाही. परंतु काहींचा खून होतो. कोणी आत्महत्या करतो. कोणाला अचानक  ह्रूदयविकाराचा झटका येऊन जीवनयात्रा संपवावी लागते. कोणी स्त्री बाळंतपणात मरते. अचानक मृत्यूने गाठलेल्या या जीवांची इच्छा अपुरी राहते; म्हणूनच असे मानले जाते की, त्यांचे आत्मेही अतृप्त राहिले असणार. मग ते कोणते तरी झाड पकडतात आणि स्वतःची वासना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. या स्वरूपाच्या विचारांचा संस्कार लहानपणापासून झालेला असतो. भूते आहेत. वेताळ, खवीस, हडळ, मुंजा असे त्यांचे अनेक प्रकार आहेत. स्त्री बाळंतपणात मेली तर तिची हडळ होते. ब्राह्मणाचा खून झाला तर त्याचा ब्रह्मराक्षस होतो. ब्राह्मण धनलोभी असेल तर त्याचा ब्रह्मसमंध होतो. पाणवठे, मसणवटे, मोडके वाडे, पडके बुरुज, वड, पिंपळ या ठिकाणी भुते रहातात. अमावस्येला मध्यरात्री ती हमखास भटकतात. त्यांना लिंबू, पिवळा भात, कोंबडे यांचा उतारा लागतो. या भूतांना डोके नसते. त्यांचे डोळे छातीवर असतात. त्यांची सावली पडत नाही. त्यांचे प्रतिबिंब दिसत नाही. त्यांचे पाय उलटे असतात. रामनाम म्हटल्यानंतर ते भूत पळते. हे सर्व काही लहानपणीच मनावर ठसवलेले असते. या संस्कारांच्या प्रभावाखाली भासाचे भूत धुमाकूळ घालते.

चार कारणांमधून ही बाब घडून येते. त्या बाबी म्हणजे ढोंग, संस्कार, माणसाचा सूचना स्वीकारणारा स्वभाव आणि इंद्रियजन्य भ्रम. या सर्वांतून सुटे सुटे किंवा एकत्रितपणे भूत या कल्पनेची निर्मिती होते.

*क्रमश:*

*तिमिरातूनी तेजाकडे* या पुस्तकातून


🎇 *कृष्णविवर कसं पाहतात ?* 🎇

आइन्स्टाइनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार कृष्णविवराची घनता इतकी प्रचंड असते, की त्यापायी त्याच्या ठायी असलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या बलातून कोणाचीही सुटका होत नाही. प्रकाशकिरण त्यात जखडून पडतात. ते तसे बाहेर न पडल्यामुळे अर्थात ते दिसण्याची शक्यता मावळते. मग ते एखाद्या ठिकाणी असल्याचं आपल्याला समजतच कसं ? एखाद्या कोळशाच्या वखारीत लपलेल्या काळ्या मांजराला बघण्याइतकंच हे कठीण आहे अशी मल्लीनाथी स्टीफन हॉकिंगनंच केली आहे.

तरीही या विश्वात असलेल्या कितीतरी कृष्णविवरांचा छडा वैज्ञानिकांनी लावला आहे. हे साध्य करण्यासाठी चार निरनिराळी तंत्र उपलब्ध आहेत. त्यापैकी एकाचा वापर करून कृष्णविवर बघता येतं.

जेव्हा एखाद्या ताऱ्याचा मृत्यू होऊन त्याचं कृष्णविवरात रूपांतर होतं, त्यावेळी त्याच्या गुरुत्वाकर्षणात कोणताही बदल होत नाही. ते पूर्वीइतकंच राहतं. त्यामुळे त्या तार्‍याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या ग्रहांच्या कक्षेतही काहीही बदल होत नाही. ते पूर्वीसारखेच आणि पूर्वीच्या वेगानंच आपली भ्रमंती करत राहतात. त्यामुळे कोणताही तारा नसलेल्या केंद्रकाभोवती असं एखादं ग्रहमंडळ घिरट्या घालत असलेलं दिसलं की तिथं कृष्णविवर असण्याची शक्यता असते.

कृष्णविवराच्या तीव्र गुरुत्वाकर्षणाच्या ओढीपायी आसपासचे वायू आणि वायुंचे ढग त्याच्याकडे जोराने खेचले जातात. ही खेच इतकी जोरकस असते की त्या वायूंचं तापमान मोठ्या प्रमाणावर वाढतं. त्यापायी मग त्या वायूंकडुन क्ष किरणांचं उत्सर्जन होतं. त्यांची नोंद घेऊन कृष्णविवराच्या अस्तित्वाचा थांगपत्ता लावता येतो.

कृष्णविवराच्या घनतेपायी ते एखाद्या भिंगासारखं काम करतं. जर आपण एखादी वस्तू आणि आपले डोळे यांच्यामध्ये भिंग धरलं तर त्या वस्तूवरून येणार्‍या प्रकाशकिरणांचं त्या भिंगांकडून वक्रीभवन झाल्यानं ती वस्तू आहे त्यापेक्षा मोठी दिसते. तसंच जर एखादं कृष्णविवर एखादा तारा आणि आपण यांच्यामधून गेलं तर त्या ताऱ्याकडून येणार्‍या प्रकाशाचीही तीच गत होते आणि त्या ताऱ्याचं तेज आकस्मात वाढतं. त्यावरूनही कृष्णविवराची माहिती मिळते.

कृष्णविवराची घनता प्रचंड असते. त्यामुळे लहानशा क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणावर अदृश्य वस्तुमानाची दाटीवाटी झालेली असते. त्यामुळे अवकाशातील वस्तुमानाचं मोजमाप करताना एखाद्या जागी जर अशी मोठ्या प्रमाणावर अदृश्य वस्तुमान असल्याची सूचना मिळाली, तर तिथं कृष्णविवर असल्याची शक्यता बळावते.

*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून*


👩🏼‍🚀 *अंतराळवीर अन्न कसं पचवतात ?* 👩🏼‍🚀

आपल्याला आपण खाल्लेलं अन्न पचवताना जड जात नाही. आपल्या शरीराची ती एक अनैच्छिक क्रिया आहे. म्हणजे अन्नपचन आपोआप होत असतं. त्यासाठी सामान्यतः आपल्याला काही जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागत नाहीत. मग अंतराळवीरांच्या बाबतीत हा प्रश्न का उठावा ? सर्वसामान्यपणे अंतराळात गुरुत्वाकर्षण नसतं असा समज आहे. अंतराळवीरांना आपल्या यानात तरंगत असताना टीव्हीवर पाहत आपण पाहिलेलं असतं. तिथे जर काडी पेटवून ज्योत निर्माण केली तर ती वर उफाळत नाही. तिथल्या तिथंच घोटाळत राहते. त्यामुळे अन्न, पाणी सगळंच तरंगत असणार असं आपण समजतो. ते तसं खरंही आहे. म्हणूनच मग, अंतराळवीर पाणी कसं पितात ? प्यायलेलं पाणी ते खाल्लेल्या अन्नाचा गोळा खाली पोटात कसा उतरतो ? असा प्रश्न पडतो. आणि अन्न पचण्यासाठी ते आधी जठरात उतरायला हवं. तसं झालं तरच तिथं मग अन्नपचनाच्या रासायनिक प्रक्रियेला सुरुवात होईल. म्हणूनच हा प्रश्न आपल्याला पडतो.

खरंतर जमिनीवरही केवळ गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावापोटी आपण घेतलेला घास जठरात उतरत नाही. आपल्या अन्ननलिकेला जोडलेले स्नायू आकुंचन प्रसरण पावत तो पुढंपुढं सरकवत राहतात. तेव्हा अंतराळातही स्नायूंची तीच प्रक्रिया पार पडत असते. अन्न घन असतं. आपण तोंडात सरकवत असतो. नुसतंच हवेतून ते तोंडात पडत नाही. तिथंही ते चावलं जाऊन लाळेत मिसळतं आणि मगच तो लगदा पुढं सरकतो. अंतराळातही तीच प्रक्रिया पार पार पडते. त्यात कोणतीही अडचण येत नाही. पण पाणी किंवा कोणताही द्रव पदार्थ पिताना काही वेळा गुरुत्वाकर्षणाचा प्रभावच कारणीभूत ठरतो. तर त्यासाठी तो द्रवपदार्थ स्ट्रॉसारख्या नळीतून तोंडात ओढून घेता येतो आणि पुढंही मग केवळ गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली त्याची पुढची वाटचाल न होता अन्ननलिकेच्या स्नायूंच्या करामतीपोटी तो जठरात उतरतो.

अंतराळात गुरुत्वाकर्षणाच्या बलाची मात्रा क्षीण असते, त्यामुळे अंतराळवीरासकट सगळ्याच गोष्टी तरंगतात. त्यामुळं जेवणाचं ताट किंवा त्यातले पदार्थ तरंगत दूर जाऊ नयेत म्हणून ते घट्ट धरून ठेवावे लागतात. जशी तूप साखर पोळी खाताना ती गुंडाळी आपण धरून ठेवतो तशी. तेवढी बाब सांभाळली की अंतराळातलं क्षीण गुरुत्वाकर्षण अन्नपचनाच्या आड अजिबात येत नाही.

*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून*


*हाइनरिक रुडॉल्फ हर्ट्झ*

*रेडियो लहरींचा शोध*

*जन्मदिन - २२ फेब्रुवारी १८५७*

हर्ट्झने इ.स. १८८८मध्ये रेडियो लहरींचा शोध लावला. नंतर त्याने सिद्ध केले की प्रकाश म्हणजे विद्युतचुंबकीय लहरींचाच एक प्रकार आहे.

वारंवारितेच्या एककाचे नाव हर्ट्झ असेच ठेवण्यात आले आहे.
त्यांनी रेडिओ तरंगांच्या प्रेषणाचे आणि ग्रहणाचे यशस्वी प्रात्यक्षिक सर्वप्रथम करून दाखविले.

हर्ट्झ यांचा जन्म हँबर्ग (जर्मनी) येथे झाला. बर्लिन विद्यापीठातून त्यांनी पीएच्.डी. पदवी संपादन केली (१८८०). या काळात त्यांना ⇨ हेर्मान फोन हेल्महोल्ट्स यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांनी १८८३ मध्ये ⇨ जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांच्या विद्युत् चुंबकीय तरंगांविषयीच्या सिद्धांताच्या अभ्यासास सुरुवात केली. १८८५–८९ दरम्यान ते कार्लझ्रूए येथील तांत्रिक विद्यालयात भौतिकीचे प्राध्यापक होते. त्यानंतर त्यांची १८८९ मध्ये बॉन विद्यापीठात भौतिकीच्या प्राध्यापक पदावर नेमणूक झाली. तेथे त्यांनी विरल केलेल्या वायूंमधील विद्युत् विसर्जनविषयक आपले संशोधन चालू ठेवले.

हर्ट्झ यांनी प्रयोगशाळेत विद्युत् चुंबकीय तरंग निर्माण केले आणित्यांची लांबी व वेग यांचे मापन केले. विद्युत् चुंबकीय तरंगांच्या कंपनांचे स्वरूप आणि परावर्तन व प्रणमन यांविषयीची त्यांची प्रवणता हे प्रकाशव उष्णता यांच्या तरंगांसारखीच असते असे त्यांनी दाखविले. परिणामतः प्रकाश व उष्णता हे विद्युत् चुंबकीय प्रारण असतात असे निःसंदिग्धपणे सिद्ध झाले.

हर्ट्झ यांचे संशोधनपर निबंध इंग्रजीत भाषांतरित करून पुढील तीन खंडांत प्रकाशित करण्यात आलेले आहेत : इलेक्ट्रिक वेव्ह्ज (१८९३); मिसेलेनिअस पेपर्स (१८९६) आणि प्रिन्सिपल्स ऑफ मेकॅनिक्स (१८९९).

हर्ट्झ यांचे बॉन येथे निधन झाले.


🔍 *बोटांचे ठसे कसे मिळवतात ?* 🔍

आपल्या तळहातांनी आणि बोटांनी आपण अनेक वस्तू पकडतो. ती पकड सुलभ व्हावी यासाठी निसर्गानं या ठिकाणची कातडी वेगळ्या प्रकारची  बनवलेली आहे. या कातडीवर केस उगवत नाहीत. शिवाय ही कातडी जर गुळगुळीत राहिली तर हातात धरलेल्या वस्तूंवर तिची पकड व्यवस्थित बसणार नाही. यासाठी या कातडीचं त्या वस्तूबरोबर घर्षण होईल आणि तसे होताना कातडीला इजा होणार नाही अशीही व्यवस्था केली आहे. त्यासाठी या कातडीवर निरनिराळ्या वळ्या पडतात. या वळ्यांच्या आत सतत घामाचा स्राव करणाऱ्या छिद्रांच्या रांगा असतात. त्या घामामुळं तळहाताला एक प्रकारचं वंगण मिळत राहतं. तसंच त्या छिद्रांना जोडलेल्या काही ग्रंथींमधून स्निग्ध पदार्थांचाही पाझर होत राहतो. जेव्हा एखाद्या वस्तूवर आपली बोटं टेकतात, तेव्हा हे घाम आणि स्निग्ध पदार्थ यांचं मिश्रण त्या वळ्यांमधून त्या वस्तूवर चिकटतं. तिथं त्या वळ्यांचा ठसा उमटतो. यालाच बोटांचा ठसा म्हणतात.

बोटांवरच्या या घर्षणवळ्यांचा रचनाबंध प्रत्येक व्यक्ती जन्मतःच घेऊन येते. कोणाही दोन व्यक्तींचे अगदी एकसारख्या एक जुळ्यांचेही बोटांचे ठसे सारखे नसतात. त्यामुळे या बोटांच्या ठशावरून कोणाचीही निर्विवाद ओळख पटवणे सहज शक्य होतं. याच गुणधर्माचा उपयोग गुन्हेगारांची अशी ओळख पटवण्यासाठी केला जातो. त्याला न्यायालयाचीही मान्यता आहे.

ज्या वस्तूला बोटांचा स्पर्श झालेला असेल त्या वस्तूवर बोटांच्या घर्षणवळ्यातील घाम आणि स्निग्ध पदार्थांचं मिश्रण चिकटतं; पण त्यापायी उमटलेला ठसा सुप्त स्वरूपातच असतो. तो डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही. त्यासाठी खास प्रकाशलहरींचा वापर करावा लागतो. त्या प्रकाशझोतात तो दिसतो; पण तो डोळ्यांना सहज दिसावा यासाठी एका खास पावडरचा, भुकटीचा वापर केला जातो.

बहुतेक भुजटींमध्ये रोझिन, काळ्या रंगाचं फेरीक ऑक्साइड आणि दिव्याची काजळी असते. इतर काही भुकटींमध्ये शिसं, पारा, कॅडमियम, तांबं, टायटॅनियम, बिस्मथ या सारखी रसायनंही असतात.

ही भुकटी त्या वस्तूंवर शिंपडली की जिथे ठसा उमटला आहे तिथल्या घाम आणि स्निग्ध पदार्थांच्या मिश्रणाला ती चिकटून बसते. ब्रशनं हलक्या हातानं उरलेली भुकटी काढून टाकली की मग चिकटलेली पावडर म्हणजेच तो ठसा स्पष्ट दिसू लागतो. एक खास पॉलिएस्टरची पट्टी त्या ठिकाणी चिटकवली की तो ठसा त्या पट्टीवर उमटतो. त्याचं छायाचित्र घेता येतं, तसाच तो संगणकातही साठविता येतो.

*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून*


*गाडगे महाराज*

*वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक*

*जन्मदिन : फेब्रुवारी २३, १८७६*

गाडगे महाराज (फेब्रुवारी २३, १८७६- २० डिंसेंबर १९५६ ) हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.
त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.

*हेन्‍री कॅव्हेन्डिश*

*एक ब्रिटिश शास्त्रज्ञ*

*हायड्रोजन वायुचा शोध*

*स्मृतिदिन - फेब्रुवारी २४, १८१०*

हेन्री कॅव्हेंडिश हा एक ब्रिटिश शास्त्रज्ञ होता. कॅव्हेंडिशला रॉयल सोसायटीचा फेलो हा मान दिला गेला होता. कॅव्हेंडिश मुख्यत्वे त्याच्या हायड्रोजनच्या शोधासाठी ओळखला जातो. त्याच्या रसायनशास्त्रातील कामाबरोबरच "पृथ्वीची घनता शोधणारा पहिला शास्त्रज्ञ" म्हणूनही तो प्रसिद्ध आहे. नंतर त्याच्या ह्या कामाचा उपयोग पृथ्वीचा भार आणि "गुरुत्वाकर्षणाचा अचल" (gravitational constant) यांचे अचूक प्रमाण शोधण्यासाठीही केला गेला

वायूंच्या गुणधर्मांच्या अभ्यासपद्धतीचा पाया घालण्यात कॅव्हेंडिश यांचा महत्त्वाचा भाग होता. १७६६ मध्ये त्यांनी ‘ज्वालाग्राही वायू’चा (आता हायड्रोजन या नावाने ओळखला जाणारा) शोध लावला. या वायूच्या ज्वलनामुळे पाणी तयार होते व पाण्यातील ऑक्सिजन व हायड्रोजन यांच्या घनफळाचे प्रमाण १:२ असते असे त्यांनी १७४८ मध्ये सिद्ध केले. नायट्रोजन व ऑक्सिजन या हवेतील दोन घटकांतून विद्युत ठिणगी नेली असता नायट्रिक अम्ल तयार होते असे १७८५  साली त्यांना आढळून आले. हा शोध औद्योगिक दृष्टया(विशेषतः खते तयार करण्यासाठी)अतिशय उपयुक्त ठरला आहे. हवेचा सु (१/१२०) पट भाग हवेच्या इतर घटकांपेक्षा निराळ्या गुणधर्माचा आहे असे कॅर्व्हेडिश यांनी दाखविले तो हवेच्या इतर घटकांपासून वेगळा करण्यातही त्यांना यश आले, परंतु तो त्यांना ओळखता न आल्यामुळे या वायूच्या (आर्‌गॉन)शोधाचे श्रेय एका शतकांनतर रॅम्झी यांना मिळाले. सुप्त उष्णता व विशिष्ट उष्णता यांसंबधी त्यांनी १७९६–९८ मध्ये संशोधन केले. वायूंच्या विश्लेषणासाठी उपयुक्त असणारी युडिऑमीटर नावाची नलिका त्यांनी तयार केली. परिपीडन-तुला(गुरुत्वाकर्षण, विद्युत भार यांसारख्या लहान प्रेरणा मोजण्यासाठी त्या प्रेरणांनी एका बारीक धाग्याला पडणारा पीळ मोजणारी सूक्ष्मग्राही प्रयुक्ती)या उपकरणाच्या साहाय्याने त्यांनी १७९८ साली गुरुत्वाकर्षण स्थिरांक मोजण्याचा प्रयोग केला व त्यावरुन पृथ्वीची सरासरी घनता काढली. आधुनिक प्रयोगावंरुन काढलेले घनतेचे मूल्य व कॅव्हेंडिश यांनी काढलेले मूल्य यांत केवळ एक टक्क्याचाच फरक आहे. यावरुन त्यांचे प्रयोग कौशल्य दिसून येते. भूविज्ञान, ध्रुवीय प्रकाश(ध्रुवीय प्रदेशांत आढळणारा विविधरंगी प्रकाशीय अविष्कार), हिंदू पंचांग यांसारख्या भिन्न विषयांतही त्यांनी लक्ष घातले होते. उष्णता म्हणजे पदार्थातील कणांची एक प्रकारची गती आहे याची कल्पना आलेली होती. विजेसंबंधी त्यांनी केलेल्या संशोधनावरुन असे दिसून येते की, पुढे कुलंब, फॅराडे व ओहम यांनी माडंलेल्या नियमाचं स्थूल कल्पना कॅव्हेंडिश यांना आलेली होती.



ते रॉयल सोसायटीचे फेलो (१७६०) व इन्स्टिट्यूट ऑफ फ्रान्सचे परदेशीय सदस्य (१८०३) होते. त्यांचे शास्त्रीय निंबध क्लार्क मॅक्सवेल, लार्‌मॉर व थॉर्प यांनी एकत्रित स्वरुपात प्रसिद्ध केले. केंब्रिज येथील एका प्रयोगशाळेला त्यांच्या कार्याच्या बहुमानार्थ कॅव्हेंडिश फिजिकल लॅबोरेटरी असे नाव देण्यात आले असून तेथे त्यांची बरीच उपकरणे जतन करून ठेवण्यात आली आहेत. ते लंडन येथे मृत्यू पावले.

😯 *खोकला का येतो ?* 😯
**************************
कधी कधी खोकला आपल्याला बेजार करतो. वर्गात सर शिकवत असताना आला तर मग आणखीच अपराधीपणा वाटायला लागतो. सर्व मुलेही त्रासिकपणे पाहतात. तेव्हा वाटते हा खोकला कायमचा बंदच झाला तर किती बरे होईल; पण थांबा, घाई करू नका. खोकला आला नाही तर आपलेच खूप नुकसान होईल. ते कसे हे समजण्यासाठी एकदा खोकून पाहा. खोकण्याच्या प्रक्रियेत आपण सुरुवातीला खोल श्वास घेतो नंतर थोडे थांबून श्वासनलिकेवर झाकणासारखे पडलेल्या एपिग्लाॅटिस या पडद्यावर दाबाखाली हवा सोडतो. हा पडदा उघडतो व दाबाने हवा बाहेर येते. त्याबरोबर थोडासा बेडकाही बाहेर येतो. धुळीचे कण जंतू (आपल्याला दिसत नसले तरी) बाहेर येतात. यावरून लक्षात येते की खोकला हे शरीराचे एक संरक्षण शस्त्र आहे. श्वासनलिकेत काही अपायकारक पदार्थ गेल्यास तेथील चेतातंतूद्वारे हा संदेश मेंदूपर्यंत पोहोचवला जातो. तेथे खोकल्याच्या केंद्रात उत्तेजना पोहोचते. तेथून संबंधित स्नायूंना आदेश येऊन खोकल्याची क्रिया होते. खोकल्याचा उद्देश हा श्वासनलिकेत शिरलेली घाण (जंतू, धुलीकण) बेडका बाहेर टाकणे हा असतो.

खोकला ही श्वसनसंस्थेच्या बर्‍याचशा आजारांमध्ये एक महत्त्वाची तक्रार असते. खोकला कोरडा आहे वा बेडक्यासहित, खोकला कसा येतो, किती वेळा येतो, बेडक्यासोबत रक्त पडते का, खोकताना छातीत दुखते का, खोकला कश्यामुळे वाढतो वा कमी होतो; अशा पूरक माहितीमुळे रोगाचे निदान करणे सोयीचे जाते.

खोकला बंद करणारी औषधे आहेत. नोस्कॅपीन, कोडेनसारख्या औषधांनी खोकला नियंत्रणात येतो; पण आजार बरा न करता फक्त खोकला बरा करणे म्हणजे, कोंबडे झाकून सूर्याला उगवू न देण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. त्यामुळे रोगाचे निदान करून त्यावर प्रभावी उपचार केल्यास आजार तर बरा होईलच, पण खोकलाही पलायन करेल आणि विनाकारण निर्माण होणाऱ्या खोकल्यावरील असंख्य औषधांच्या वापराला तरी आळा बसेल.

*डॉ. जगन्नाथ दीक्षित*
*डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून
मनोविकास प्रकाशन
०२० ६५२६२९५०

🤢 *रोग का होतात ?* 🤢
*************************

रोग का होतात, हा एक मूलभूत प्रश्न आहे मानव जेव्हा जन्माला आला तेव्हापासून त्याचा पिच्छा पुरवणाऱ्या रोगांबद्दल त्याला कुतूहल वाटणे स्वाभाविकच आहे. हजारो वर्षांपूर्वी देवाच्या कोपामुळे, सैतानाच्या करणीमुळे, जादूटोण्यामुळे व भूताखेतांमुळे रोग होतात असे समजले जाई. त्यानंतर काही शतकांनंतर असा शोध लागला की नुसत्या डोळ्यांनी न दिसणारे सूक्ष्म असे जीव शरीरात आल्यामुळे रोग होतात. त्या काळात क्षयरोग, कुष्ठरोग अशा भयानक रोगाच्या जंतूंचे शोध लागले. ही समजूत नंतर शतकभर रूढ होती. कर्करोग हृदयविकार, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारखे रोग का होतात; याचे कारण मात्र नक्की ठरवता येत नव्हते. तेव्हा रोग बहुविध कारणांमुळे होतो, अशी कल्पना पुढे आली. हीच कल्पना सध्याही रूढ आहे. या कल्पनेप्रमाणे रोग कसे होतात, ते आता पाहू. रोगकारक घटक, मनुष्य व त्याचे पर्यावरण या तिन्ही घटकांमध्ये समतोल राखला गेला तर माणूस निरोगी राहतो. या तिन्ही घटकांमधील समतोल बिघडल्यास रोग होतात. अशी सध्या संकल्पना गृहीत धरली जाते.

रोगकारक घटकात शरीरावर अयोग्य परिणाम घडवून आणणारे जीवाणू, विषाणू असे जीवजंतू, रासायनिक व विषारी पदार्थ यांचा संपर्क, उष्णता, थंडी, इजा, दुखापत, कुपोषण, अतिपोषण, मानसिक ताणतणाव, तसेच चुकीची औषधयोजना यांचा समावेश होतो. मानवी घटकांत वय, लिंग, जात, धर्म, शिक्षण, आनुवंशिक गुण, व्यसने, पोषण, त्याचे राहणीमान व रोगप्रतिकारक शक्ती आदींचा समावेश होतो. दारिद्र्य, दाटीवाटीने बांधलेली घरे, वायूवीजनचा अभाव, प्रकाशाचा अभाव मलमूत्र विसर्जन व विल्हेवाटीच्या व्यवस्थेचा अभाव, अज्ञान, हवा पाणी माती यांचे प्रदूषण आदी कारणांचा पर्यावरणातील घटकांमध्ये समावेश होतो. यामुळेच घरादारात, वातावरणात क्षयरोगाचे असंख्य जंतू असूनही धूम्रपान करणाऱ्या, रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या वा सामाजिक व आर्थिकदृष्ट्या खालच्या थरात असणाऱ्या लोकांनाच क्षय होतो. रोग कसे होतात याबाबतच्या या नवीन संकल्पनेमुळे हृदयविकार, मधुमेह या रोगांची कारणमीमांसाही करता येते. रोगकारक घटक व पर्यावरण यांचा समतोल राखला तरच माणूस रोगमुक्त होऊ शकेल; हेही या कल्पनेतून प्रतिध्वनित होते.

*डॉ. जगन्नाथ दीक्षित*
*डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून
मनोविकास प्रकाशन
०२० ६५२६२९५०


*आनंदीबाई गोपाळराव जोशी*

*भारतातील पहिल्या महिला डॉक्टर*

*स्मृतिदिन - २६ फेब्रुवारी १८८७*

आनंदीबाई गोपाळराव जोशी (मार्च ३१, इ.स. १८६५- फेब्रुवारी २७, इ.स. १८८७) या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या.
वैद्यकीय शिक्षण
लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४व्या वर्षी एका मुलास जन्म दिला. परन्तु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ १०च दिवस जगू शकला . हीच खंत आनंदीबाईना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली . त्यांनी शिकून डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. गोपाळरावांनी यासंदर्भात अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती, आणि धर्मांतर करणे तर या जोडप्यास मान्य नव्हते. मात्र त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत . पुढे आनंदीबाईची तळमळ आणि गोपाळरावांची चिकाटी यांचे फलित त्यांना भेटलेच. या दोघांना अपेक्षित असेच घडले आणि आनंदीबाईना ख्रिस्त धर्म न स्वीकारता १८८३मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी "वुमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ़ पेन्सिल्व्हानिया" मध्ये प्रवेश मिळाला. दरम्यान, नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील एका जोडप्याच्या मदतीमुळे सर्व काही पार पडत गेले.

कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च इ.स. १८८६ मध्ये आनंदीबाईना एम.डी. ची पदवी मिळाली. एम.डी. साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’. एम.डी. झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडूनसुद्धा त्यांचे अभिनंदन झाले . हा खडतर प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता. तिच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः उपस्थित राहिले. पंडिता रमाबाई होत्या. ‘भारतातील पहिली स्त्री डॉक्टर’ म्हणून सर्व उपस्थितांनी उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून तिची प्रशंसा केली. स्वप्न पुरे झाले. आनंदी भारतात परतली. एव्हाना तिला क्षयाची बाधा झाली होती. बोटीवर कुणीही गोऱ्या डॉक्टरने तिला बिगर- गौरवर्णीय म्हणून उपचार केले नाही. मायदेशी पोहोचल्यानंतर समुद्रोल्लंघन करून आलेली, त्यातून स्त्री म्हणून हिंदू डॉक्टर किंवा वैद्यही तपासून पाहिनात!
भारतात आगमन
एम.डी. झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले . सर्वत्र अभिनंदन झाले. त्यांना कोल्हापूर मधील अल्बर्ट एडर्वड हॉस्पीटल मधील स्त्री-कक्षाचा ताबा देण्यात आला.
मृत्यू
वयाच्या विशीतच त्यांना क्षयरोग झाला. पुढे काही महिन्यातच म्हणजे २६ फेब्रुवारी, इ.स. १८८७ रोजी त्यांना पुण्यात मृत्यू आला.
केवळ २१ वर्षाच्या जीवन यात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. दुदैर्वानं आनंदीबाईंच्या बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही. मात्र 'चूल आणि मूल' म्हणजेच आयुष्य असं समजणाऱ्या महिलांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला. एकीकडे सावित्रीबाई व ज्योतिबा स्त्रीशिक्षणासाठी खस्ता खात असतानाच आनंदी -गोपाल हे जोडपे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी झटत होते . जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही मोठे काम अशक्य नाही . समाजात राहून काम करायचे तर अडथळे येणारच. मात्र त्यावर मात करून आपले ध्येय प्राप्त करून दाखविणे यातच जीवनाची खरी सार्थकता आहे, असे आनंदीबाईंच्या आयुष्यावरून उमजते.

👨🏼‍⚕ *स्टेथोस्कोपमुळे डॉक्टरांना काय समजते ?* 👨🏼‍⚕
*********************************

स्टेथोस्कोप नसलेल्या डॉक्टरची कल्पनाही आपण करू शकत नाही. किंबहुना एखाद्या डॉक्टराने रुग्णाची तपासणी करताना स्टेथोस्कोप वापरला नाही तर रुग्णाच्या कपाळावर नक्कीच आठ्या पडतात व "काहीच तर तपासले नाही" असे उद्गारही तो काढतो. याचाच गंमतशीर प्रकार खेड्यात बघायला मिळतो. गुडघा दुखला तर गुडघ्यालाही स्टेथोस्कोप लावण्याची बिकट अवस्था डॉक्टरवर येऊ शकते वा क्वचित व्यवसायाच्या दृष्टीनेही तो तसे मुद्दाम करतो. या स्टेथोस्कोपमुळे डॉक्टरांना नेमके काय कळते, असा प्रश्न अनेकदा तुम्हाला पडला असेल. स्टेथोस्कोपमुळे डॉक्टरांना खूप काही कळते, हे जरी खरे असले तरी सगळेच काही कळते असे नाही.

स्टेथोस्कोपचा छातीला लावण्याचा भाग, नळ्या व कानात ठेवायचे प्लग्ज असे तीन भाग पाडता येतील. छातीला लावण्याच्या भागास धातूची एक उघडी चपटी डबी व त्यावर एक पातळसा पडदा बसवलेला असतो. हा पातळ पडदा आवाजाची तीव्रता अनेक पटींनी वाढतो व त्यामुळे शरीरात निर्माण होणारे आवाज डॉक्टरांना ऐकू येतात. हृदय आकुंचन प्रसरण पावत असताना येणारे हृदयाचे ठोके, श्वास घेताना व सोडताना येणाऱ्या श्वसनाचे आवाज स्टेथोस्कोपच्या सहाय्याने ऐकता येतात. त्यांच्याच झालेल्या बदलामुळे हृदयाच्या झडपांचे आजार, फुप्फुसाचा न्युमोनिया, क्षयरोग, दमा अशा आजारांचे निदान करता येते. याखेरीज पोटाला स्टेथोस्कोप लावल्यास आतड्यांच्या आकुंचन प्रसरणामुळे येणारे आवाज ऐकता येतात. या आवाजामुळे आतडय़ांत अडथळा (obstruction) निर्माण झाला असल्यास त्याचे निदान होऊ शकते. गर्भवती स्त्रीच्या पोटावर स्टेथोस्कोप ठेवून तिच्या गर्भाशयातील बाळाच्या हृदयाचे ठोकेही मोजता येतात. मूल जिवंत आहे वा नाही, त्याला पुरेसा रक्तपुरवठा होतोय वा नाही हेही स्टेथोस्कोप ने कळू शकते. यावरून लक्षात येईल की स्टेथोस्कोपने अनेक रोगांचे निदान करता येते; पण डोके दुखण्यास डोक्याला, गुडघा दुखल्यास गुडघ्याला वा मान लचकल्यास मानेला स्टेथोस्कोप लावून काहीच उपयोग होणार नाही !

*डॉ. जगन्नाथ दीक्षित*
*डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून
मनोविकास प्रकाशन
०२० ६५२६२९५०

ग्रॅहम बेल

*अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल*

*दूरध्वनी यंत्राचा शोध*

*३ मार्च १८४७*

अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल (३ मार्च १८४७, २ ऑगस्ट १९२२) यांचे सगळ्यात महत्त्वाचे संशोधन म्हणजे दूरध्वनी. दूर अंतरावर असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा आवज काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचविणारे यंत्र असावे असे वाटत असल्याने बेल यांनी दूरध्वनी यंत्राचा शोध लावला.
बालपण
बेल यांचा जन्म ३ मार्च १८४७ रोजी एडिनबरा, स्कॉटलंड येथे झाला. त्यांचे आजोबा, वडील - अलेक्झांडर मेलव्हिल बेल आणि भाऊ या सगळ्यांचा मूक-बधिरांच्या शिक्षणाशी जवळचा संबंध होता. तर त्यांची आई आणि पत्नी या दोघीही कर्ण बधिर होत्या. लहानपणी अलेक्झांडर हे नाव ठेवण्यात तरी वयाच्या ११ व्या वर्षी स्वतःच्या नावात ग्रॅहॅम नाव टाकून घेऊन मग अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल या नावाने पुढे ते ओळखले जाऊ लागले. मूक-बधिरांसाठी शिक्षण सुलभ व्हावे, त्यांना इतरांचे बोलणे कळावे यासाठी अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल सतत प्रयत्नशील होते. त्यासाठी बोस्टन विद्यापीठात स्वरयंत्राचे कार्यशास्त्र शिकविण्यासाठी नेमण्यात आले. तेथेच बधिरांसाठी यंत्र तयार करण्याचे प्रयत्न बेल करीत होते. असे यंत्र बनविण्याच्या पयत्नात बेल असतांनाच ते मेबल ह्यूबर्ड नावाच्या कर्ण बधिर मुलीच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी त्यांचा विवाह झाला. पत्नीला बेलच्या यंत्राविषयी कळल्यावर तिनेच ओठांची हालचाल वाचता येणे हाच बधिरांसाठी कसा सर्वोत्तम पर्याय आहे हे पटवून सांगितले. मग बेल यांनी तसे यंत्र बनविण्याचे प्रयत्न सुरू केले आणि त्यातच दूरध्वनी यंत्राचे कोडे उलगडले.
कार्य
बेल यांनी माणसाच्या स्वरयंत्राचा आणि कानाचा अभ्यास करून पहिले दूरध्वनी यंत्र तयार केले. दि. २ जून १८७५ या दिवशी आपले सहकारी वॉटसन यांच्यासह काम करीत असतांना दुसऱ्या खोलीतील वॉटसन यांच्या हाताच्या धक्याने ट्रान्समीटर थरथरला, तो लहानसा आवाजही बेल यांना ऐकू आला. मग बेल यांनी आपल्या ट्रान्समीटरचा उपयोग करून सहकारी वॉटसन यांना आपल्या खोलीत येण्याविषयी सांगितले. बेल यांचा तो संदेश सहकारी वॉटसन यांनी ऐकून तसा प्रतिसाद दिल्यावर संदेशाची देवाणघेवाण झाल्याबद्दल दोघांची खात्रीच पटली. बेल आणि वॉटसन यांनी या यंत्रावर आणखी प्रयोग करून दि. १५-०२-१८७६ या दिवशी आपल्या यंत्राचे पेटंट घेण्यासाठी अर्ज दाखल केला. तेव्हा पेटंट कार्यालयातच बेल यांना समजले की अशाच प्रकारच्या प्रयोगासाठी आणखी चार अर्ज पेटंट कार्यालयात पडून होते. हे पेटंट युद्ध बराच काळ सुरू होते, शेवटी बेल यांना दूरध्वनी यंत्राचे पेटंट मिळाले.
योगदान
बेल यांनी तयार केलेल्या आपल्या यंत्राचे प्रयोग अमेरिकेत आणि युरोपमध्ये केले. त्यानुसार नोव्हेंबर १८७७ साली बेल यांना बर्लीन शहरात दूरध्वनीचे जाळे पसरविले. १८८५ साली बेल यांनी द अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनीची स्थापना केली. नंतर ही कंपनी बेल टेलिफोन कंपनी म्हणून ओळखली जावू लागली. दि. २ ऑगस्ट १९२२ या दिवशी बेल यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून समस्त अमेरिकेतील दूरध्वनी संच एक मिनीट बंद ठेवण्यात आले.
उल्लेखनीय
विज्ञान विषयक सर्व प्रकारची माहिती नियतकालिकारुपाने जगाच्या समोर यावी या हेतुने १८८२ साली बेल यांनी सायन्स नावाचे नियतकालिक सुरू करण्यात पुढाकार घेतला तसेच आपल्याजवळील पैसा लावून हे नियतकालिक आठ वर्षे सतत सुरू ठेवले. पुढे हे नियतकालिक अमेरिकन असोसिएशन फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेचे अधिकृत नियतकालिक झाले.
१८९८ ते १९०४ या काळात बेल नॅशनल जिओग्राफिक सोसायटीचे अध्यक्ष होते.


एडवर्ड कल्व्हिन कँडल

*एडवर्ड कॅल्व्हिन केंडल*

*जीवरसायनशास्त्रज्ञ*

*जन्मदिन - ८ मार्च १८८६*

अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ. केंड्ल व त्यांचे सहकारी फिलिप एस्. हेंच आणि स्वित्झर्लंडचे टाडेयस राइशस्टाइन या तिघांना मिळून १९५० चे शरीरक्रियाविज्ञान आणि वैद्यक या विषयांचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. ‘अधिवृक्क ग्रंथीच्या (मूत्रपिंडाच्या वरच्या टोकाशी असलेल्या ग्रंथींच्या) बाह्यकातील (बाहेरील कवचासारख्या भागातील) अंतःस्रावांचा शोध, त्यांची रासायनिक संरचना (रेणूतील अणूंची रचना) व जैव परिणाम’ या संशोधनाकरिता हे पारितोषिक त्यांना मिळाले.

त्यांचा जन्म कनेक्टिकटमधील साउथ नॉरवॉक या गावी झाला. १९०८ मध्ये कोलंबिया विद्यापीठाची बी. एस्. आणि १९१० मध्ये त्याच विद्यापीठाची पीएच्. डी. या पदव्या त्यांनी मिळविल्या. त्यांनी १९११–१९१४ पर्यंत न्यूयॉर्क येथील सेंट ल्यूक रुग्णालयात काम केले. त्याच सुमारास त्यांनी अवटू ग्रंथीवरील (श्वासनालाच्या पुढच्या व दोन्ही बाजूंस असलेल्या अंतःस्रावी ग्रंथीवरील) संशोधनास प्रारंभ केला. १९१६ मध्ये मेयो क्लिनिकमध्ये काम करीत असताना त्यांनी थायरॉक्सिन हे औषधिद्रव्य अलग करण्यात यश मिळविले. नंतर मेयो क्लिनिकच्या जीवरसायनशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी त्यांची नेमणूक झाली. १९२१–१९५१ या काळात ते मिनेसोटा विद्यापीठाच्या शरीरक्रिया–रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक होते. १९५२ नंतर त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठाच्या जेम्स फॉरेस्टॉल संशोधन केंद्रातील रसायनशास्त्र विभागात, तसेच इतर पाच विद्यापीठांत अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले.

अधिवृक्क ग्रंथीच्या बाह्यकातून मिळणाऱ्या एकूण २८ प्रकारांच्या अंतःसावांचा केंड्ल यांनी १९३० मध्ये शोध लावला. त्यांपैकी चार प्रकारच्या अंतःस्त्रावांचा प्राणिशरीरावर परिणाम होतो असे आढळून आले. ह्या चारांपैकी ‘ई’ ह्या प्रकारच्या पदार्थास पुढे ⇨कॉर्टिसोन  हे नाव मिळाले व ते एक प्रभावी औषध ठरले आहे. हायड्रोकॉर्टिसोनचा शोधही केंड्ल यांनीच लावला.

केंड्ल यांनी थायरॉक्सिन (१९२९) या विषयावर एक व्याप्तिलेख (मोनोग्राफ) व इतर विषयांवरील २०० निबंध व समीक्षणे निरनिराळ्या शास्त्रीय नियतकालिकांतून लिहिली. नॅशनल अ‍ॅकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सभासद म्हणून १९५० साली त्यांची निवड झाली. त्यांना सिनसिनटी, येल, वेस्टर्न रिझर्व विद्यापीठ (कोलंबिया) आणि नॅशनल विद्यापीठ (आयर्लंड) या विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेट आणि अमेरिकन मेडिकल अ‍ॅसोसिएशन सुवर्णपदक (१९६५) हे बहुमान मिळाले. ते प्रिन्स्टन येथे मरण पावले.


युरी गागारीन

*युरी गागारिन*

*सोवियेत संघाचा अंतराळयात्री*

*अंतराळात जाणारा सर्वप्रथम माणुस*

*जन्मदिन - ९ मार्च १९३४*

युरी अलेक्सेइविच गागारिन (रशियन: Ю́рий Алексе́евич Гага́рин, उच्चार: [ˈjurʲɪj ɐlʲɪˈksʲeɪvʲɪtɕ gɐˈgarʲɪn];) (मार्च ९, इ.स. १९३४ - मार्च २७, इ.स. १९६८) हा सोवियेत संघाचा अंतराळयात्री होता.
युरीचा जन्म सोवियत संघाच्या ग्रामीण भागातील एका गरीब कुटंबात झाला. घरच्या परिस्थितीमुळे लहान वयातच धातूच्या ओतकामाच्या कारखान्यात फाउण्ड्रीमन म्हणून युरी काम करू लागला. अविश्रांत कष्ट आणि तीव्र बुद्धिमत्ता असल्याने एक चांगला कामगार म्हणून युरीचे नाव झाले. त्याला विमानाच्या कारखान्यात नोकरीची संधी आली. याही कामात त्याने मेहनत घेऊन नाव कमावल्याने त्याला विमानदलात घेण्यात आले. हळूहळू युरीला अंतराळवीर होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.
एप्रिल १२, इ.स. १९६१ रोजी गागारिन अंतराळात जाणारा सर्वप्रथम माणूस ठरला. पृथ्वीच्या कक्षेबाहेर युरीने ८९ तास ३४ मिनिटे भ्रमण केले. या पराक्रमाबद्दल त्याला अनेक देशांचे पुरस्कार मिळाले. त्यात ऑनर ऑफ लेनिन आणि सोवियत संघाचा नायक या पुरस्कारांचाही समावेश आहे.
वयाच्या ३४ व्या वर्षी एका विमान अपघातात युरीचा मृत्यु झाला.


*सावित्रीबाई फुले*

*मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला*

*पहिल्या महिला शिक्षिका*

*स्मृतिदिन - १० मार्च  इ.स. १८९७*

सावित्रीबाई फुले (जन्म : नायगाव-सातारा जिल्हा, जानेवारी ३, इ.स. १८३१ - मृत्यू : पुणे, मार्च १०, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.
१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.(यापूर्वी मिशनऱ्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तरी भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या.
सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.
शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.
जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.


मेरा पांडुरंग नही दुंगी- प्रा.हरी नरके
10 मार्च 1897 ला सावित्रीबाई गेल्या. काम करता करता गेल्या.
पुण्या-मुंबईत प्लेगनं कहर मांडला होता. शेकडो माणसं दररोज मरत होती. त्यांच्या मृत्यूची नोंद करायला नगरपालिकेजवळ कारकून नसल्यानं आज 367 लोक मेले. आज 289 लोक लोक मेले अशा नोंदी नगरपालिकेच्या दप्तरात केल्या जात होत्या.

ब्राह्मण विधवेकडून दत्तक घेतलेला सावित्रीबाईंचा मुलगा यशवंत डॅाक्टर होता. तो सैन्यात नोकरीला होता. सावित्रीबाईंनी त्याला तार करून पुण्याला बोलावून घेतले. हडपसरजवळ ससाणे मळ्यात तंबू टाकून दवाखाना सुरू करायला लावला. तो आईला ह्या आजाराची भीषणता समाजावून सांगत होता. सावित्रीबाईंचा एकच प्रश्न होता, "आज जोतीराव असते तर ते निष्क्रिय बसून राहिले असते काय? आपल्याला जमेल तेव्हढ्यां रूग्णांना आपण वाचवूया."

त्याकाळात न अ‍ॅंब्युलन्स होती ना स्ट्रेचर. आजार भयानक होता. संसर्गजन्य होता. आजारी माणसाला स्पर्श केला तर माणूस मरतो हे डोळ्याला दिसत असल्यानं पुणे शहरावर मृत्यूची छाया पसरलेली होती. कुणीही मदतीला येत नव्हतं. पुणे शहरभर प्लेगच्या उंदरांचं आणि गिधाडांचं साम्राज्य पसरलेलं होतं.


अंधश्रद्धेमुळं लोक औषधपाणी करायला, घरात फवारणी करून घ्यायला घाबरत होते. पुण्यात रॅंडसाहेब आरोग्याची सक्ती करीत असल्याची नाराजी वाढत होती.
सावित्रीबाई एकटीनं घरोघर फिरून आजारी असलेल्या लहान मुलं, मुली, महिला यांना उपचारासाठी यशवंतच्या दवाखान्यात घेऊन जात होत्या. स्वत: त्यांची सुश्रुषा करीत होत्या.

इतक्यात मुंबईत कामगार नेते आणि भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे प्लेगने आजारी असलेल्या कामगारांवर, रूग्णांवर उपचार करताना गेल्याची बातमी आली. सावित्रीबाईंना शोक अनावर झाला. जवळचा खंदा कार्यकर्ता गेला.
पण त्या रडत बसल्या नाहीत. उठल्या नी पुन्हा कामाला लागल्या.

पुणे शहरातले बहुतेक सगळे पुढारी जिवाच्या भितीनं गावोगावी पांगले होते.

सावित्रीबाईंनी कित्येकांना वाचवले. बरे केले.

मुंढव्याच्या दलित वस्तीतल्या गायकवाडांच्या मुलाला प्लेग झाल्याचं सावित्रीबाईंना समजलं. गायकवाड अस्पृश्य मानले जात असल्यानं सरकारी वैद्यकीय कर्मचारीही मदत करीत नव्हते.
सावित्रीबाई तिथं धावून गेल्या.

पांडुरंग गायकवाड 11 वर्षांचा होता. काखेत गोळा आलेला. तापानं फणफणलेला.
एका चादरीत पोराला गुंडाळलं. पाठीवर घेतलं.

सावित्रीबाईंचं वय झालेलं होतं. गेली पन्नास वर्षे त्या अहोरात्र राबत होत्या. 7 वर्षांपुर्वीच जोतीराव गेलेले होते.
मुंढवा ते हडपसरचा ससाणे मळा, व्हाया मगरपट्टा पल्ला मोठा होता.

67 वर्षे वयाची एक म्हातारी बाई अकरा वर्षांच्या आजारी पोराला पाठीवर घेऊन साताठ किलोमीटर चालत जाते.
त्याच्यावर उपचार करते. त्याला बरा करते. पांडुरंग जगतो. मोठा होतो.

सावित्रीबाई त्याला पाठीवर घेऊन चालल्या असतील तेव्हा त्या नक्की प्लेगला सांगत असणार, "मेरा पांडुरंग नही दुंगी."
मृत्यूला त्यांच्यापुढे पराभव पत्करावा लागला.

पण त्याच काळात, त्याच कामात सावित्रीबाईंना मात्र प्लेगचा संसर्ग झाला.
पांडुरंग हा त्यांनी वाचवलेला शेवटचा रूग्ण.

सलग 50 वर्षे आपला देह या समाजासाठी, महिला, मुलं, मुली यांच्यासाठी त्यांनी वाहिलेला होता. आता देह थकला होता.
10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई प्लेगमध्ये रूग्णसेवेचं काम करता करता गेल्या.

राजकीय स्वातंत्र्यासाठी लढणारे इतिहासात अजरामर झाले.
या सामाजिक शहीदांसाठीही आपण एखाद दुसरा आसू असू द्यावा.
-प्रा. हरी नरके

सावित्रीबाई फुले